आशाताई बच्छाव
सण रक्षाबंधनाचा
रक्षाबंधन हा भारत देशातील अत्यंत लोकप्रिय सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. भारतात वेगवेगळ्या भागात यास वेगवेगळी नावे आहेत. जसे नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, पोवती पौर्णिमा, कजरी पौर्णिमा, इत्यादी.
रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण आहे. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम हे निस्वार्थी व पवित्र असते. राखीचा धागा केवळ साधा, सुती धागा नसून ते एक शांततेचे, आपुलकीचे, प्रेमाचे आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे. ‘रक्षा’ म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे ‘धागा’. रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजे रक्षाबंधन होय. या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या मनगटावर राखी बांधते भावाला ओवाळते. भावाच्या सुखी, समृद्धी, निरोगी, आनंदी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही या दिवशी बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. प्रत्येक भाऊ बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य महत्त्व दिले जाते.
या दिवशी बहिण भावाला त्याच्या आवडीचे गोड पदार्थ खाऊ घालते व भाऊही आपल्या प्रिय बहिणीला भेट वस्तू देतो.
या सणामागे अशी ही कथा आहे की महाभारतात कृष्णाने द्रोपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण केले. तर द्रौपदीने ही शिशुपालाच्या वधावेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या साडीचा तुकडा फाडून तो जखमेवर बांधला. तेव्हापासून श्रीकृष्णाने आणि द्रौपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण करण्याचे ठरवले.
आजच्या युगात रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ-बहिणी यांच्या पुरता मर्यादित राहिला नाही. देशाचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांना, महिला राखी बांधतात. तसेच पर्यावरण रक्षण करणाऱ्या वृक्षांना, तर काही तरी नोकर आपल्या मालकाला राखी बांधतात. राखी बंधनाच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. रक्षाबंधन भाऊ बहीण यांच्या पुरते न ठेवता निसर्गाची पूजा, गुरुची पूजा, आईवडिलांचे पूजा करून हा सण साजरा करावा. रक्षाबंधन हा सण शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारा सण आहे. भारतामध्ये हा सण प्रचंड उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. अशा सणाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
सविता तावरे मुंबई स्पेशल रिपोर्टर युवा मराठा न्युज