आशाताई बच्छाव
लेखन करत रहा आपली कविता आपल्याला एक दिवस ओळख देईल—प्रा.वा.ना.आंधळे’
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
सृजनशक्तीचा साक्षात्कार ज्यांच्या ठायी होतो. ते सर्व लेखन भाग्यवान असतात. स्वानंदातून प्रारंभी केलेले लेखन पुढे जाऊन समाजाच्या कामी येते. लेखन करत रहा आपली कविता आपल्याला एक दिवस ओळख देईल असे भावोद्गार जळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या हिरवळीवर साहित्य विकास मंडळ आयोजित कविसंमेलनात संमेलनाचे अध्यक्ष कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी उपस्थित कवी समुदायासमोर व्यक्त केले. संमेलनाच्या व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ कवी गोविंद देवरे व प्रमुख अतिथी कवी घनश्याम भुते यांची उपस्थिती होती.
अडीच तास चाललेल्या या कवी संमेलनात संपुर्ण जिल्हाभरातुन कवींनी उपस्थिती दिली. निसर्ग, समाज, राजकारण, प्रथा-परंपरा, देशभक्ती या विविध विषयांवर कवींनी आपापल्या रचना सादर केल्या. गेय कवितांनी संमेलनात रंगत आणली त्यात कवी रमेश धुरंधर, भीमराव सोनवणे, पानाचंद चौधरी, प्रकाश पाटील, प्रवीण महाजन, विजेंद्र पाटील, अजय तायडे यांच्या सुरांनी चांगलाच ताल धरला. इंदिरा जाधव यांच्या कवितेतून कवीची महिती सुंदर चित्रित झाली व कविता दाद मिळवून गेली. कवी अरुण कुमार जोशी यांच्या दमदार कवितेने श्रोते भारावले तर कु.वैशाली महिफत तायडे यांनी कवी पित्यास केलेले वंदन दाद मिळवून गेले. गोविंद देवरे, वा. ना.आंधळे, घनश्याम भुते,डॉ.ज्ञानेश्वर जाधव, कडुजी बाभूळकर, निवृत्तीनाथ कोळी, सौ.पुष्पलता कोळी, शिवलाल बारी, राहुल तायडे, संतोष साळवे यांच्या कवितांनी चांगलीच उंची गाठली. मोहनसिंग राजपूत, मंदाकिनी मोरे, सुखदेव वाघ, श्यामकांत बाविस्कर, शांताराम बारी, डॉ.शेट्टी यांनी आपापल्या रचना सादर करीत कवी संमेलनाचा आनंद द्विगुणित केला.
प्रस्तुत प्रसंगी आलेल्या सर्व कवींना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ कवी गोविंद देवरे यांनी सन्मानपत्र देऊन गौरविले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन युवा कवी राहुल महिफतराव तायडे यांनी केले.