आशाताई बच्छाव
.( भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी:- फुलेमाळवाडी ता.देवळा येथील गटनंबर ६६ मधील कुळांना डावलून परस्पर सदर जमीन खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून न्याय मिळावा यासाठी येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर ३० पेक्षा जास्त शेतकरी गुरुवार (ता.२६) रोजी आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असूनही शासनाच्या वतीने कोणी दखल न घेतल्याने उपोषण कायम आहे.
याबाबत या उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी महसूलमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदार डॉ.राहुल आहेर यांच्यासह इतर संबंधित अधिकारी आणि पोलीस विभाग यांना निवेदने देत याबाबत कळवले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, फुलेमाळवाडी ता.देवळा येथील गट नंबर ६६ वरील १७ हेक्टर १९ आर जमिनीचे मूळ सर्व्हे नंबर असलेल्या ३५५, ३५६, ३६८, ३६९ या गटांना या शेतकऱ्यांचे आजोबा कुळ असल्याने वारसाने त्या कब्जे वहिवाटीत आल्या. ७०-७५ वर्षांपासून जमीन कसली जात असून तशा पिकपाहणींची सदरी नोंदी झाल्या आहेत. अर्थात मूळ जमीन मालक यांचा आता काही एक कब्जा नसताना सदर जमीन खरेदी घेणाऱ्यांनी सनदी अधिकारी विवेक गायकवाड यांना हाताशी धरून त्यांची पत्नी पौर्णिमा गायकवाड व इतरांच्या नावे ही जमीन केली आहे. सदर मिळकतीबाबत कुळ जमीन मालक यांच्यात कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार केसेस न्यायप्रविष्ट असतानाही सदर जमिनीच्या खरेदी व्यवहारात बेकायदेशीर, नियमबाह्य काम करून तहसीलदार देवळा यांनी खरेदी व्यवहार नोंदणीकृत केला आहे आणि यात मंडळ अधिकारी लोहोणेर यांची मध्यस्थी आहे, असाही आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच या साऱ्या प्रकरणातील व्यवहारामुळे कुळ कायदा तरतुदींचा भंग झाला असल्याचेही म्हटले आहे.
या १७.१९ हेक्टर आर क्षेत्रजमिन वडिलोपार्जित कुळ म्हणून असल्याने त्यात या शेतकऱ्यांची घरे-विहिरी असून तशा नोंदी दप्तरी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या जमिनी त्यांनी विकसित करून त्या लागवडीखाली आणल्या असून बागायती केल्या आहेत. असे सारे असताना अधिकारी व इतरांनी संगनमताने प्रतिबंधित गट खुला करून खरेदी-विक्री व्यवहार नोंदणीकृत झाला आहे. त्यामुळे या कुळांच्या ५० ते ६० कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायाबाबत शासन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदने देण्यात आली असून याबाबत तात्काळ चौकशी होऊन न्याय मागणीसाठी आमरण उपोषण करत असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. उपोषण करणाऱ्यांत रामचंद्र बागूल, नानाजी शेवाळे, दादाजी बच्छाव, नथु आहिरे, दयाराम बागूल, बुधा बच्छाव, शिवाजी शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, अनिल शेवाळे, पुंडलिक शेवाळे, सरलाबाई शेवाळे, मधुकर बच्छाव, भागाबाई बच्छाव, भीमाबाई शेवाळे, लताबाई शेवाळे, कुसुमबाई शेवाळे, उज्वला बागूल, सुभाष बागूल, संजय आहिरे, चंद्रकांत बच्छाव, पोपट बच्छाव, विनोद शेवाळे, तुषार बागूल, साहेबराव बागूल, नानाजी बच्छाव आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.