आशाताई बच्छाव
भाजपात जल्लोषाचे वातावरण रत्नागिरीत स्वागताचे बॅनर्स झळकले अनेक प्रलंबित विकासकामांसाठी मागण्या करणार
द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन
रत्नागिरी,(सुनील धावडे): राज्यात भाजपा- शिवसेना- शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मंत्री चव्हाण यांच्या स्वागताचे बॅनर्स सर्वत्र झळकले आहेत. विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मंत्री चव्हाण यांच्याकडे मागण्या करण्यात येणार आहेत. रखडलेला एसटी स्टॅंड, शहरातील रस्त्यांची कामे यासह अनेक मागण्या यावेळी करणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
मंत्री रवींद्र चव्हाण आज २६ जुलै रोजी सायंकाळी सुरवातीला कशेडी घाट येथे येणार असून मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरुस्ती कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते परशुराम घाटाचीही पाहणी करतील. त्यानंतर चिपळुणला ते आढावा बैठक घेणार आहेत. तसेच शनिवारी 27 ऑगस्ट रोजी ते सकाळी 08.00 वाजता रत्नागिरी शहरातील खराब रस्त्यांची पाहणी करणार आहेत. दुरुस्त केलेले रस्ते, नव्याने केलेले रस्ते चालण्याच्या योग्यतेचे राहिलेले नाहीत. त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याबाबत योग्य तो निर्णय मंत्री रवींद्र चव्हाण घेणार आहेत. निकृष्ट रस्त्यांबाबत अभियंत्यांच्या निलंबनाची मागणीसुद्धा भाजपाचे नगरसेवक करणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एमएच ०८ पासिंग असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी, अशी महत्त्वाची मागणीसुद्धा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. याशिवाय रत्नागिरीतील कुवारबाव ते साळवी स्टॉप या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, त्यासंदर्भातील निवेदनही मंत्री चव्हाण यांच्याकडे भाजपाच्या वतीने दिले जाणार आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला एसटी स्टॅंड कधी मार्गी लागणार आहे, अशी विचारणा लाखो प्रवासी करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडेही भाजपाच्या वतीने लक्ष वेधले जाणार आहे.
रत्नागिरी शहराच्या दौऱ्यानंतर मंत्री चव्हाण लांजा येथे मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करणार आहेत. तिथून ते राजापूरला रवाना होणार असून तेथेही महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. तसेच आगामी निवडणुकांसाठीही मंत्री चव्हाण यांचे रत्नागिरीवर विशेष लक्ष राहणार आहे. यामुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.