आशाताई बच्छाव
मौजा पारडी कुपी येथील त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा वाली कोण?
आमदार डॉ देवरावजी होळी यांचा प्रशासनाला सवाल
२ जून रोजी शेतामध्ये आग लागल्याने ११ शेतकऱ्यांचे ३६ लक्ष रुपयांचे सुबाभूळ , निलगिरी व सागवान जळून नष्ट
प्रशासनाला अर्ज देवूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याबाबत शेतकऱ्यांचे आमदारांना निवेदन
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मौजा पारडी कूपी येथील ११ शेतकऱ्यांच्या शेतामधील जवळपास ३६ लक्ष रुपयांची सुबाभूळ ,निलगिरी व सागवनाची झाडे आगीमुळे जळून नष्ट झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्याला मदत मिळावी याकरीता शासन स्तरावर पाठपुरावा, पत्रव्यवहार केला परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची सहायता प्रशासनाकडून मिळालेली नाही त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा वाली कोण असा सवाल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाला केली आहे
जळून नष्ट झालेल्या झाडाबाबतचे निवेदन पारडी कुपी येथील शेतकर्यांनी आमदार महोदयांना दिले. यावेळी उदय शरद लोंढे, वासुदेव मुकुंदा निकुरे ,नेताजी पाटील लोंढे, रमेशजी राणे, बंडू पाटील झाडे, पाल पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते.
पारडी कुपी येथील विजय विजय पारटवार यांच्या शेतीमध्ये आंध्रप्रदेश येथील राम किसन मदुगुला (हल्ली मुक्काम कनेरी टोली) यांच्या घरी कापसाची लागवड केलेली होती त्यातील धसकटे दिनांक २ जून रोजी सकाळी ८ वाजता पेटविले व निघून गेले. परंतु ती आग न विझता उदय शरद लोंढे ,अंताराम किसन उरकुडे, वासुदेव मुकुंदा निकुरे, चंदा वासुदेव निकुरे, जीवन झिंगूजी गंडाटे, रवींद्र गंडाटे ,रमेश तुळशीराम राणे, शकुंतला शामराव मूरतेली, आनंदराव मेश्राम ,छायाताई ईश्वर मुळे, रामेश्वर गोपाळा कुंभारे या ११ शेतकऱ्यांच्या ५३ एकर शेतात पसरली त्यामुळे त्याच्या शेतातील ३६ लक्ष रुपये किमतीचे सुबाभूळ निलगिरी सागवण या जातीची झाडे जळून नष्ट झाली.
या घटनेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून त्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. आपल्याला नुकसान भरपाई मिळावी याकरिता त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला परंतु अजूनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य त्यांना मिळालेले नाही. याबाबत प्रशासनाला वारंवार विचारूनही कोणीही सहकार्य करायला तयार नाही त्यामुळे या शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित केला असून या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.