राजेंद्र पाटील राऊत
परभणी जिल्ह्यातील ६४ गावाचा विज पुरवठा २४ तास खंडीत
युवा मराठा न्युज नेटवर्क:
(ब्युरो चीफ:परभणी शत्रुघ्न काकडे पाटील)
परभणी शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दुपारी ४:०० वाजता तालुक्यातील झरीसह परिसरातील ६४ गावांचा वीज पुरवठा तब्बल २४ तास खंडीत झाला. परिणामी उकाड्याने येथील ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले. परंतु, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. सद्यस्थितीला महावितरण ग्रामीण भागात वसुलीवर अधिक भर देत आहे, मात्र त्यांना सोयीसुविधा देण्याबाबत कानाडोळा करीत आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजता वाऱ्यामुळे ३३ केव्ही मध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. शनिवारी दुपारी ४:०० वाजता वीज पुरवठा सुरु करण्यात आला. परंतु पुन्हा दुरुस्तीचे कामे सुरु केल्याने झरीतील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला. २४ तास वीज गायब झाल्याने ६४ गावातील नागरीकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, विद्युत बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार ग्रामीण भागामध्ये सध्या वाढला आहे. परंतु, वीज पुरवठा खंडत होत असल्याची तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये संताप निर्माण होत आहे. तसेच झरीसह परिसरात वीज कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक राहीले नाही. त्यांचा मनमानी कारभार चालू असल्यामुळे वेळेप्रसंगी फ्यूजसाठी सामान्य ग्राहकास पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत कुठलेही सोयरसुतक राहीले नाही.