अखेर राज्यातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे उद्यापासून सुरु करण्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांचा निर्णय
विशेष प्रतिनिधी -( राजेश एन भांगे
युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबई, १५ – कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली आहेत. यावरून सरकारवर मोठी टीका होत होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील सर्व मंदिरे प्रार्थनास्थळे सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे.
पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही.
हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे.
राज्यातील मंदिरे बंद असल्याने भाजपसह अनेक व्यवसायिकांनी ती सुरू करण्याची मागणी केली होती. भाजपने राज्यभरातील मंदिरात आंदोलने केली होती. अखेर उद्धव ठाकरेंनी मंदिरे उघडणार असल्याची घोषणा केली आहे.
तरी यामध्ये नियम व अटी देखील देण्यात आल्या आहेत. जरी मंदिरे सुरू करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणात गर्दी करता येणार नाही असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.