राममंदिराच्या निधीसाठी देशाच्या घराघरात जाऊ, लॉकडाऊनमध्ये आले २ कोटी रुपये ; स्वामी गोविंदगिरी महाराज –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
दि. २१ – अयोध्येतील राममंदिर हे राष्ट्राचा आत्मा आहे. मंदिराला निधी देण्यासाठी सारखी विचारणा होते आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक 2 कोटी रुपये आले. मंदिराला किती निधी लागेल याचा अंदाज नाही, मात्र यासाठी देशाच्या घराघरात जाऊ अशी माहिती राममंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी दिली. पाच ऑगस्ट रोजी मंदिराचा शिलान्यास होणार असल्याचे माध्यमांकडून कळले पण पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचेही महाराजांनी स्पष्ट केले.
शिलान्यासासाठी मोजक्याच लोकांना परवानगी
सध्या देशावर कोरोना महामारीचे भयंकर संकट ओढवले आहे. त्यामुळे जेव्हाही शिलान्यासाचा कार्यक्रम ठरेल त्यात लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे कठोरतेने पालन केले जाईल असे स्वामी गोविंदगिरी महाराजांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी मोजक्याच 100 ते 150 लोकांना बोलावण्यात येईल असेही ते म्हणाले. जेथे हा कार्यक्रम होईल तेथे सोशल डिस्टन्सिगचे पालन करण्यात येईल असेही ते म्हणाले.
अयोध्येतील राममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत शिलान्यासाच्या कार्यक्रमावर चर्चा होऊन पंतप्रधान कार्यालयाकडे काही तारखा कळवण्यात आल्या. या बैठकीत मंदिराची निर्धारित 128 फूट उंची वाढवून 161 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंदिराचा विस्तार 67 एकरापुरता मर्यादित न ठेवता 120 एकरात करण्यावरही एकमत झाले. शिलान्यासाची तारिख अजून निश्चित झालेली नाही, पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही अधिकृत संदेश आलेला नाही त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचे महाराजांनी टाळले.
अयोध्येतील राममंदिर हे राष्ट्राचा स्वाभिमान आहे, प्राण आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक घरातून मंदिरासाठी सेवा अपेक्षित आहे. यासाठी एक देशव्यापी अभियान चालवण्यात येईल. त्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील असल्याचे स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले.