आशाताई बच्छाव
राज्यातील कृषी केंद्राची झाडाझडती केंव्हा होणार ?-वसंतराव देशमुख
तपासणीच्या नावावर राज्याच्या कृषी विभागाचे अधिकारी जमा करतात चंदा
दैनिक युवा मराठा जाफराबाद -मुरलीधर डहाके
दिनांक २६/०८/२०२४
याविषयीची सविस्तर माहिती अशी की, राज्यात अनेक कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक सर्रास सुरू असून शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याची भावना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. राज्यात अनेक बोगस खतं व कीटकनाशकं तयार करणाऱ्या कंपन्या जन्मास आल्या आहेत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक होत आहे. परंतु याविषयी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असता संबंधित अधिकारी दुकानदारावर कारवाई करण्याच्या ऐवजी स्वतःचे खिशे भरून घेतात आणि त्यांना आणखी जोराने भ्रष्टाचार करण्याचं लायसन्स देऊन परत येतात ही राज्यातील वस्तुस्थिती व वास्तविक परिस्थिती आहे. अशा बोगस कृषी केंद्रांची झाडाझडती केव्हा होणार ? असा प्रश्न अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
दरवर्षी राज्यातील अनेक कृषी केंद्र चालकाकडून बोगस बियाणे ,खतं व कीटकनाशकांची विक्री करून शेतकऱ्यांना फसविले जाते.१०० रुपये किंमतीचे किटकनाशक १००० रुपयाला विकलं जातं.विशेष म्हणजे २०२४ या खरिप हंगामाच्या सुरवातीलाच बोगस खतं शेतकऱ्यांना विकले असल्याची माहिती राज्यभर पसरली होती यावर संबंधित राज्यसरकारच्या कृषी विभागाने काय कारवाई केली? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.शेतकऱ्यांची दरवर्षी होत असलेली आर्थिक फसवणूक थांबेल का? कृषी दुकानदार शासन परिपत्रकांचं व शासनाच्या नियमांचं पालन करत नाहीत,तर हे असं का होतं याचाहि विचार कुठेतरी होणं गरजेचं आहे.कृषी विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजरोसपणे बोगस किटकनाशकांची विक्री करून कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांच्या खिशावर दिवसा दरोडा टाकतात आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची बरोबरी करतात.
बियाणं, किटकनाशकं, खतं यासारखी शेतकऱ्यांची फसवणूक कुठेही नाही.प्रमाणीत बियाण्यामध्ये अप्रमाणित बियाण्यांची भेसळ केली जाते.किटकनाशकात तेलाची भेसळ केली जाते आणि खतामध्ये रेती भेसळ करून पॅकिंग करून विक्री केली जाते.विशेष म्हणजे दानेदार सुपर फॉस्फेट याची किंमत कमी असल्याने डि.ए.पी.या खतांच्या बॅग मध्ये भरुन डि.ए.पी.म्हणुन विक्री केली जात आहे.असे अनेक गोरख धंदे कृषी विभागाच्या अकार्यक्षम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने राज्यात सर्वत्र सुरू आहे.परंतु याविषयी कोणीच बोलायला तयार नाही संबंधित कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी नाही परंतु राजकीय पुढारी तर नाहीच नाही.राजकिय पुढारी आपलं राजकीय साम्राज्य टिकविण्यासाठी आटापिटा करत असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळच मिळत नाही.त्यामुळे आपली लढाई आपणच लढावी यासाठी शेतकरी बांधवांनी सदैव तत्पर रहावे असा संदेश अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.त्वरित संबंधित कृषी केंद्राची झाडाझडती घेऊन गुन्हेगारावंर कठोर कारवाई केली नाही, तर येत्या काळात
यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून समीतीचे पदाधिकारी अशा भ्रष्ट अधिकारी व कृषी केंद्र चालक यांचा बुरखा फाडून उघडं -नागडं केल्याशिवाय राहणार नाही व त्यांचा समाचार घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. असा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी दिला आहे.
हे कार्य एकट्याचे नसुन राज्यातील शेतकऱ्यांनी याकामी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना मदत व सहकार्य करावे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांची या भस्मासुरापासुन सुटका करणे सहज शक्य होईल असे आवाहनही त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.