आशाताई बच्छाव
कालबाह्य व लटकणाऱ्या विद्युत तारांपासुन शेतकरी तसेच नागरिकांच्या जिवाला धोका
महावितरण कंपनीने कालबाह्य व जिर्ण होऊन लटकणाऱ्या तारा बदलाव्यात-वसंतराव देशमुख प्रदेशकार्याध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 31/05/2024
जालना जिल्ह्यातील शेतशिवारामध्ये विद्युत खांबावरील जीर्ण झालेल्या व लटकत असलेल्या विद्युत तारांमुळे शेतकरी तसेच इतर नागरिकांसह जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. खूप वर्षापूर्वी ओढलेल्या विद्युत तारा आता उन्हामुळे व पावसामुळे खराब होऊन जिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व जनावरांच्या जीवाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे.संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित महावितरण कंपनीने कालबाह्य झालेल्या तारा बदलाव्यात अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशकार्याध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी केली आहे.अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे विद्युत खांबासह तारा तुटल्या व अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले यासोबतच अनेक शेतकऱ्यांच्या गाई -म्हशी, बैल,बकऱ्या, मृत्यूमुखी पडले.अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळाली नाही.तसेच संबंधित विज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यामध्ये शेतकऱ्यांना सहकार्य सुद्धा करत नाहीत हि बाब अत्यंत गंभीर आहे.आजही अनेक गावं अक्षरशः अंधारात चाचपडत असतात पुरवठा खंडित झाला तर तो सुरळीत करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना काहीतरी आर्थिक देवाणघेवाण करावी लागते अन्यथा विजपुरवठा सुरळीत होत नाही हि वस्तुस्थिती आज ग्रामीण भागांत सगळीकडेच पहावयास मिळत आहे.अशा अनागोंदी कारभारामुळे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
विज पुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या अनेक तक्रारी करुन देखील उपाय योजना केल्या जात नाहीत असा आरोप श्री वसंतराव देशमुख यांनी केला आहे.दरमहा विज बिल भरणाऱ्या ग्राहकांना एखाद्या महिन्यात बिल भरायचे अनावधानाने विसरले तर अशा ग्राहकांचे विज कनेक्शन तोडण्यात येते परंतु काही व्यापारी, व्यावसायिक, कारखानदार अवैध मार्गाने विज वापरतात आणि कंपनीला बिलापोटी एक छद्दामही देत नाहीत अशा विज चोरी करणाऱ्यांना आनखी मदत केली जाते हि सत्य परिस्थिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.विजवितरण कंपनीची हि कृती म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशीच असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशकार्याध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी दिली आहे.