*देवळा तालुक्यातील वाजगाव येथे चोरटय़ांनी केला कांद्यावर हात साफ जवळपास ८० ते ९० हजाराचे नुकसान*. देवळा, (भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
सध्या कांद्याला सोन्या सारखा भाव मिळू लागल्याने कांद्याची चोरी होण्याच्या घटना तालुक्यात घडू लागल्या आहेत. याचा प्रत्यय वाजगाव येथील शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. येथील संजय दिनकरराव देवरे यांच्या शेतातील चाळीत साठवून ठेवलेल्या १५ ते २० क्विंटल कांद्यावर रविवारी रात्री चोरांनी हात साफ केल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. सद्या बाजारात भाजीपाल्या बरोबरच इतर पिकांनाही चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतमालाच्या चोऱ्यात वाढ झाली आहे.
गतवर्षी वाजगाव येथिल कांदा उत्पादक शेतकरी संजय दिनकरराव देवरे यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले होते. बाजारात कांद्याचे दर चढ-उतार होत असल्याने व निश्चित भाव मिळत नसल्याने शेतकरी चाळीतच कांदा साठवण्यावर भर देतात. त्याप्रमाणे वाजगाव येथिल कांदा उत्पादक शेतकरी संजय दिनकरराव देवरे यांनी वाजगाव येथील चणकापूर उजव्या कालव्या शेजारी, वाजगाव खर्डा रस्त्यालगत असलेल्या शेतातील ( गट नं. ५४५ ) चाळीत ३०० क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. यातील काही कांदा त्यांनी बाजारात विक्री केला होता. उर्वरीत ५० क्विंटल कांद्याची निवड करून कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने चाळीत ठेवला होता. परंतु रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चाळीतील शिल्लक असलेल्या पन्नास क्विंटल कांद्यापैकी 15 ते 20 क्विंटल कांदा लंपास केला श्री संजय देवरे यांचे आजच्या बाजार भावा प्रमाणे जवळपास ८० ते ९० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे सोमवारी सकाळी संजय देवरे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी देवळा पोलिस स्टेशनला कांदा चोरीला गेल्याची फिर्याद दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी करूण पंचनामा केला पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, सुनिल पवार. सावळे. सहकारी करीत आहेत.
_