आशाताई बच्छाव
जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न म्हणजे सरकारचे नवे सोंग जुना देखावा!
—- बोरशे गुरुजी
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 10/04/2025
खरेच!सरकारला समाजाची तळमळ असेल तर शिक्षणावरचा खर्च वाढवा! जिल्हा परिषद शाळांना पुरेसे शिक्षक द्या.शिक्षकांना असैक्षणिक कामे देऊ नका! शाळांना अगोदर सर्व सोयी सुविधा द्या .
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या
” शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” या उपदेशाचा देशातील जनतेवर विशेषतः गरीब वर्गावर अतिशय चांगला परिणाम झालेला दिसून येतो त्यामुळे पालकांचा शिक्षणाकडे कल आहे.ही शैक्षणिक दृष्ट्या सध्या जमेची बाजू आहे. त्यासाठी खर्च करण्यासही पालक तयार आहेत. त्याचाच फायदा काही संधी साधू लोक घेत आहेत.त्यामुळेच इंग्रजी शाळांचे वाढते पीक मोठ्या प्रमाणात फोफावत असून या सर्व शाळा मोठ्या लोकांच्या धनिकांच्या धनदांडग्यांच्या व्यावसायिकांच्या आणि पुढाऱ्यांच्या आहेत. त्यामुळे या शाळेमध्ये शिक्षण कमी आणि व्यवसाय जास्त चालत आहे. त्यामुळे सरकारी शाळेच्या शिक्षकांचे पगार जास्त शाळा डबघाईला आल्या आणि खाजगी शाळांचे शिक्षकांचे पगार कमी असून त्या शाळा मजल्यावर मजले बांधत आहेत असे चित्र दिसून येते.आणि ते वास्तव आहे. अपप्रचार केला जातो की जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सर्व सोयी आहेत भरपूर पगार आहेत तरी ते विद्यार्थ्यांना चांगले शिकवत नाहीत. त्यांच्या मुलांना ते खाजगी शाळेमध्ये टाकतात.जिल्हा परिषद च्या शाळेत शिकवत नाहीत. तेथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही. परंतु वास्तव असे आहे की जिल्हा परिषदेचे शिक्षक ही स्पर्धापरीक्षातून आलेले आहेत अतिशय हुशार आहेत परंतु त्यांना सतत इतर असैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवणे शिक्षकांची संख्या पुरेशी नसणे वर्ग खोल्या नसणे मोडकळीस येणे त्या शाळांच्या कडे सतत दुर्लक्षित असणे, शासनाचे उदासीन धोरण त्यामुळे आठवीपर्यंतच्या शाळेला एक किंवा दोन शिक्षक देऊन सरकार आणि समाज पुन्हा त्यांच्याकडून गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा करते हे 100% चुकीचे आहे उलट पक्षी दहा-बारा हजारावर रुपयावर फक्त विद्यार्थ्यांना शिकविण्याचेच काम करतो.त्यांना कार्यालयीन काम तसेच इतर अशैक्षणिक कामे नसतात. त्यामुळे खाजगी शाळेतीत प्रत्येक तासाला वेगळा शिक्षक असतो प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक विषयासाठी शिक्षक असतात. त्यामुळे त्यांचे काम चांगले झाल्याचा भास आपल्याला होत असला तरी त्या ठिकाणी फक्त व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून काम चालते इकडे जि.प. शाळा डबघाईला आणायच्या पुरेसे शिक्षक द्यायचे नाहीत.शिक्षणावर खर्चही वाढवायचा नाही, त्यामुळे सीबीएसई पॅटर्न राबवणार म्हणजे सरकारचे नवे सोंग आणि जुनाच देखावा अशी परीस्थिती होणार आहे. सरकारला खरेच जर समाजाची विद्यार्थ्यांची गरीब जनतेची तळमळ कळकळ असेल आणि शैक्षणिक प्रगती घडून आणायची असेल शैक्षणिक क्रांती करायची असेल तर पहिल्यांदा शिक्षणावर होणारा शासकीय खर्च वाढवा प्रत्येक शाळेला सर्व सुविधांनी युक्त करा प्रत्येक वर्गाला आणि विषयाला शिक्षक द्या. प्राथमिक शाळांना कारकून शिपाई सर्व सोयी सुविधा द्या. नंतरच अशा प्रकारे सीबीएससी पॅटर्न राबवणे व इतर कार्यक्रम राबवा आणि शिक्षकांच्या माथ्यावर अपयशाचे खापर फोडणे बंद करा.
–— बोरशे गुरुजी
राहणार करजगांव
तालुका भोकरदन जिल्हा जालना.






