आशाताई बच्छाव
विद्यार्थ्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी श्रीरामपूरकर भारावले
रंगलहरी व श्रीरामपूर पत्रकार संघ आयोजित चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीरामपूर,,,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- निसर्गचित्र, व्यक्तीचित्र, प्राण्यांचे चित्र, पेन्सिल स्केच, वॉटर कलर स्केच अशी चित्रांची आगळी वेगळी दुनिया सजली होती लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात. निमित्त होते शहरातील रंगलहरी चित्रकला अकॅडमी व श्रीरामपूर पत्रकार संघाने भरविलेल्या विद्यार्थ्यांच्या चित्र प्रदर्शनाचे. गेली तीन दिवस या आगळ्यावेगळ्या चित्रपट प्रदर्शनाला श्रीरामपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांमधील चित्रकारांचा गौरव केला.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकार रवी भागवत व ज्येष्ठ चित्रकार भरतकुमार उदावंत यांनी विद्यार्थ्यांच्या चित्र प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनात पाचवीपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी ४५३ चित्र काढून सहभाग नोंदविला. मुंबई येथील रेखा चित्रकार व व्यंगचित्रकार निलेश जाधव, शिल्पकार व चित्रकार प्रमोद कांबळे,श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, संतलुक रुग्णालयाचे प्रमुख डॉ.वसंत जमधडे, त्वचारोग तज्ञ डॉ. रमेश गोसावी आदी मान्यवरांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब भांड, प्रकाश कुलथे, पद्माकर शिंपी, मनोज आगे, राजेंद्र बोरसे,महेश माळवे, करण नवले, प्रदीप आहेर मिलिंदकुमार साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले, पिढी बदलते हा काळाचा महिमा आहे, परंतु आपण जे काम आवडीने हाती घेतो. जो छंद जोपासतो. त्यात सातत्य ठेवणे हे प्रत्येकाच्या हातात आहे. प्रमोद कांबळे म्हणाले, चित्राची भाषा खऱ्या अर्थाने युनिव्हर्सल आहे. चित्रकला ही अशी कला आहे की ती वैश्विक ओळख निर्माण करून देते. ज्या विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड आहे, त्यांनी चित्रकलेतच करिअर केले पाहिजे असे नाही. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा, परंतु त्या क्षेत्रात एकाग्रता, आत्मविश्वास मिळवण्यासाठी चित्रकलेची कास सोडू नका.
शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील तीन दिवस श्रीरामपुरातील सर्व क्षेत्रातील कलाप्रेमींनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवार दिनांक ४ रोजी सायंकाळी चित्र प्रदर्शनाचा समारोप पार पडला. समारोप सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार लहू कानडे म्हणाले, चित्रकलेचे महत्व जगाने ओळखले आहे.आपल्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे. ती जपण्यासाठी चित्रकार रवी भागवत व भरतकुमार उदावंत यांनी व्यासपीठ निर्माण करून दिले. या दोघांचेही कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी पत्रकार विकास अंत्रे ,नवनाथ कुताळ, मयूर पांडे, अनिल पांडे, बद्रीनारायण वढणे, स्वामीराज कुलथे आदी मान्यवर उपस्थित होते.आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी, कलाशिक्षक राजेंद्र घोडके, निवेदक आदिनाथ अन्नदाते आदींसह पत्रकार संघाचे सदस्य, पालक व विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी भवरलाल परमार, प्रमोद लबडे, चंद्रकांत क्षीरसागर, अक्षय त्रिभुवन, पुरुषोत्तम झवर आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोकराज आहेर, चित्रकार सत्यजित उदावंत सह कलाप्रेमींनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक संतोष मते यांनी केली. प्रास्ताविक पत्रकार विकास अंत्रे यांनी केले.
चौकट एक
प्रदर्शनाची रशियन कला रसिकाला पडली भुरळ
विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन लागल्याचे समजताच शहरात कामानिमित्त आलेल्या रशियन महिला एन्रीओ या मनिशा आगाशे यांच्या समवेत आवर्जून चित्र प्रदर्शनाला भेट दिली. सुमारे दोन तास हॉलमधील प्रत्येक चित्र पाहण्याचा आनंद त्यांनी घेतला. त्यानंतर भारतीय मुलांमध्ये चित्रकला उपजत आहे. तिला आकार देण्याचे व फुलविण्याची काम या प्रदर्शनाने केले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
चौकट क्रमांक दोन
तालुक्यातील सर्व शाळांची चित्रकला स्पर्धा भरविणार
श्रीरामपूर सारख्या छोट्याशा गावात विद्यार्थ्यांच्या चित्र प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद ही फार मोठी उपलब्ध आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय यांची एकत्र चित्रकला स्पर्धा रंगलहरी कला अकादमीने भरवावी. त्यातून चित्रांच्या दर्जेनुसार त्यांना गौरविण्यात यावे. या उपक्रमासाठी लागणारा सर्व आर्थिक भार पेलण्यासाठी मी तयार आहे,असे आमदार कानडे म्हणाले.
चौकट क्रमांक तीन
मुलं जगली मोबाईल फ्री आयुष्य
प्रदर्शनामध्ये ज्या विद्यार्थ्यांची चित्रे लावण्यात आली होती ते विद्यार्थी कलारसिकांना चित्राविषयी माहिती देत होते. यासाठी भल्या सकाळीच विद्यार्थी आगाशे सभागृहात येत होते. सुमारे तीन दिवस विद्यार्थी चित्रकला आणि फक्त चित्रकला जगले. या काळात मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया याची आठवणही मुलांना आली नाही. हा अनुभव स्वतः पालकांनी कार्यक्रमात शेअर केला. त्याचबरोबर अनेक पालकही आपल्या पाल्यामध्ये कला गुण जागावे म्हणून चित्र प्रदर्शनाला मुलांसह आवर्जून भेट देत होते.
फोटो ओळी-
रंगलहरी चित्र प्रदर्शनास मिळालेला उदंड प्रतिसाद