आशाताई बच्छाव
माणुसकी
देवाने प्रत्येकाला मन दिलेले आहे.प्रत्येक मनात विचार ,संवेदना, आनंद,दु:ख,आशा, निराशा अशा कितीतरी भावना सामावलेल्या आहेत.ज्यात माणुसकी आहे त्या माणसात देवाचा अंश आहे असे आपण म्हणू शकतो.माणुसकी म्हणजे इतरांविषयी वाटणारी सहानुभूती,कदर, समोरच्याचा आदर, कुठलीही अपेक्षा न ठेवता दुस-याची केलेली मदत.ज्याच्यात माणुसकी असते तो मनुष्य दुसऱ्याला ऐनकेन प्रकारे सहाय्य करतो.त्यासाठी तो आपले दु:ख बाजूला ठेवून इतरांसाठी झटतो.
माणुसकीची ओळख माणसाच्या विचारातून, बोलण्यातून, आचरणातून होत असते.पण आज परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही.आजचा माणूस माणुसकी विसरत चाललाय.याचा परिचय आपल्याला पदोपदी येतो.जो-तो फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू लागलाय.दुस-याचा त्रास,दुस-याचे दु:ख याच्याशी कुणालाही काही देणेघेणे नसते.माणसातली माणुसकी कुठेतरी हरवून गेली आहे.आत्ताची परिस्थिती बघता माणूस माणसात नाही.त्यामुळे फारच बिकट अवस्था निर्माण झाली आहे.परक्यांशी माणुसकीचे नाते जपणे तर सोडाच,घरच्यांशीही माणुसकीने माणूस वागत नाही.जो-तो आपल्या विश्वात रमलाय.मानवी मन माणसाच्या विपरीत वागण्याने त्रासून गेले आहे.माणूस कुठेतरी एकटा पडत चाललाय.त्याची शांती कुठेतरी हरवून गेली आहे.आजचा माणूस जास्तीतजास्त आत्मकेंद्री होत चाललाय.त्याला फक्त स्वतःचाच विचार असतो.जीवन यंत्रगत झाले आहे.
किती सोपा शब्द आहे माणुसकी.पण याचा अर्थ आज माणूस विसरत चाललाय.आजच्या धावपळीच्या जगात माणसाला आपल्या माणसांची चौकशी करायला सुध्दा वेळ नसतो.असे कित्येक प्रसंग आयुष्यात येत असतात जेव्हा आपल्यासाठी कोण झिजतो,कोण चांगले किंवा वाईट वागतो याचा प्रत्यय येत असतो.माणसाचे मोठेपण त्याच्या वयानुसार ठरत नसून त्याची वागणूक,त्याचा दृष्टीकोन, नात्यांमध्ये जपलेले प्रेम यातून ठरत असते.माणसाने आज अवकाशाला गवसणी घातली आहे.परंतु त्याचे वागणे अतिशय स्वार्थी झाले आहे.एखाद्या माणसाचा अपघात झाला की काही माणसे अपघातग्रस्त व्यक्तीची मदत न करता त्याचा व्हिडिओ काढत बसतात.ही आहे का माणुसकी? नक्कीच नाही.काही माणसे जाती- धर्माच्या नावावर इतरांना नाहक त्रास देतात जे अगदी चुकीचे आहे.जनावरे तरी एकवेळ परवडली,पण माणूस आपल्या वागण्यातून, बोलण्यातून जास्तच घातक, हिंस्र झाल्याचे दिसून येते.आजच्या धावपळीच्या जीवनात काही कारणांमुळे एकमेकांविषयी द्वेष, गैरसमज निर्माण होतात आणि संबंधांमध्ये एक गाठ पडते.माणसाने सारेकाही आपल्या बुध्दीच्या जोरावर पादाक्रांत केले आहे.माणसाचे कर्तृत्व खरेच वाखाणण्याजोगे आहे.पण याच हुशारीमुळे त्याला गगन ठेंगणे वाटू लागले आहे. माणूस आपल्या लोकांशी, समाजाशी असलेलं नातं विसरत चाललाय.खरंतर एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्यात खरी माणुसकी आहे.कित्येक घरांमध्ये भावाभावांचे,बहिणीबहिणींचे,
बहिणभावाचे पटत नाही.त्यांच्यात आपुलकी, जिव्हाळा राहिला नाही.कुटुंबपातळीवर प्रेम,त्याग,लोभ, आपुलकी, जिव्हाळा या गोष्टी लोप पावत आहेत.कधीकधी आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला मानसिक आधाराची गरज असते.अशावेळी जर आपले लोकच आपल्याला सांत्वना देऊ शकले नाही तर काय उपयोग? मिळणा-या थोड्या आधारानेही दु:खात असलेली व्यक्ती सावरू शकते.पण तेवढीही तसदी हल्ली कुणी घेत नाही.जर आपल्यामुळे कोणाचे भले होत असेल,एखाद्याचा आत्मविश्वास वाढत असेल तर तेथे नेहमीच मदत करायला सज्ज असले पाहिजे.
अन्न, वस्त्र, निवारा या जरी माणसाच्या मुलभूत गरजा असल्या तरी यांच्यापेक्षाही काही गोष्टी आहेत ज्या माणसाला समाजाशी बांधून ठेवतात.त्यातली एक गोष्ट म्हणजे माणुसकी.माणुसकी फक्त माणसांपुरती मर्यादित नाही.माणुसकी प्राण्यांप्रती, निसर्गाप्रती सुध्दा असायला हवी.चला तर माणुसकी जपूया!
लैलेशा भुरे
नागपूर