आशाताई बच्छाव
पाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे
८ नोव्हेंबर पर्यंत जायकवाडीत पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाच इशारा
घनसावंगी/अंबड/जालना-दिलीप बोंडे : पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश देऊनही जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात आलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आडमुठ धोरणामुळे दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्याचे पाणी अडवण्यात आले आहे. राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तत्काळ सोडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश प्राधिकरणास द्यावे, ८ नोव्हेंबर पर्यंत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणात न आल्यास, ९ नोव्हेंबर पासून हक्काच्या पाण्यासाठी आणि पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या नेत्यांची खोड मोडण्यासाठी शेतकऱ्यांसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार राज्यातील धरणातील उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचे धोरण आखलेले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यासाठी प्रत्येक वेळी संघर्षच करावा लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आडमुठ धोरणामुळे सध्या दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्याचे पाणी आदेश देऊनही सोडण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत जायकवाडी धरणाच्या वरील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. 15 ऑक्टोबर २०२३ रोजीच्या जायकवाडी धरणातील पाण्याच्या स्थितीनुसार आणि समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार 31 ऑक्टोबर २०२३ पर्यंत 8.603 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.