आशाताई बच्छाव
देशातील लोकशाही वाचवायची असेल, तर घोटाळेबाज ई. व्ही. एम. विरूध्द जन आंदोलन उभारले पाहिजे…!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संजय एम.देशमुख,निंबेकर, पत्रकार
संपादक- साप्ता.विश्वप्रभात
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
निरोगी समाजव्यस्था आणि विकासाला धोका निर्माण करणाऱ्या या देशात ठीकठीकाणी जेव्हा लोकांचे जीवन असुरक्षित करणारे निर्लज्ज आणि गुन्हेगार निर्माण झाले. त्या त्यावेळी संतापलेल्या जनतेने आपल्या पध्दतीने या घटनांना तोंड दिल्याची अनेक उदाहरणे या देशात आजपर्यंत घडलेली आहेत.मानवतावादाचे बाळकडू घेऊन जन्माला आलेली येथील सुसंस्कारीत सुधारलेली जनता नेहमी शांत…संथ वाटत असली तरी या शांततेच्या मागे निर्माण झालेला क्रोध हा भस्मासुरालाही भष्म करू शकतो,याचा परिचय शौर्याच्या आदर्शांनी पुरूषार्थ दाखविणाऱ्या या देशात अनेक प्रसंगी समोर आलेला आहे.मग तो छत्रपतींच्या संदेशांनी विरता अंगी बाळगणाऱ्या अनेक मावळ्यांनी घडविलेला असू द्या , किंवा त्यांच्या खांद्याला खांदा लावलेल्या विरांगणीनींचा महिषासुरमर्दिनी अवतार असू द्या. समाजजीवन नासविणाऱ्यांचा अंत या समाजानेच कसा घडवून आणला.तो नागपूरच्या अक्कू यादव सारख्या अनेक पिलावळींना जेरबंद करणारा ठरला.थोडक्यात या शांततावादी समाजाचा देशातील राजकारण आणि प्रशासनातील दुर्जन,दुराचारी,अनैतिक खोटारड्या प्रवृत्तींनीही अंत पाहू नये.अन्यथा निर्माण होणाऱ्या अराजकतेचा ज्वालामुखी त्यांनाही भस्म केल्याशिवाय राहणार नाही.
या देशात निर्माण झालेल्या अनैतिक राजकारणाचा पायंडा पाहून अनेक समाजसुधारक,सेवाव्रती,शुर वीर महापुरूष सुध्दा आज स्वर्गात अश्रू ढाळत असतील.येथील स्वायत्त संस्था,देशाच्या कंपन्या,मालमत्तांची विक टाक… लोकशाहीची विटंबना आणि घटनेचे उल्लंघन होऊनही झालेल्या अन्यायाला न्याय म्हटले जात आहे.मग खरोखरच न्यायदेवता एवढी आंधळी आहे का ? ” *बोके बेमालूपणे दूध पिऊन* *जातात.गरीब आंधळे बिचारे दळत* *राहतात आणि त्यांचे पीठ* *लांबवण्याचे काम अप्रामाणिक धुर्त* *करीत राहतात*.” नुसत्या स्वार्थी प्रवृत्तीने चाललेल्या या सर्व नतद्रष्ट कारभारात देशातील जनता दबावाखाली आहे.या स्वतंत्र देशाची लोकशाही जीवंत आहे की आजच मरणप्राय घटीका मोजत आहे, यावर चिंतन करून अस्वस्थ झाली आहे. आज देशात वाढलेली महागाई,सर्वसामान्न्य आणि छोट्या उद्योजकांना बॅंकींग प्रणालीचे प्रचंड आर्थिक भुर्दंड,त्यांच्या पैशातून मलीदे गोळा करणे. पै पै करून कमावलेल्या पैशाला परत सहज मिळविण्याचेही स्वातंत्र्य या लोकशाहीवादी स्वतंत्र भारतात हिरावले गेले आहे. बॅंकबुडवे पोसलेले उद्योगपती मात्र दिवाळे काढून पळून जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात स्वारस्य नाही म्हणून ते जीवन संपवत आहेत.बेरोजगारांना भिक मागण्याशिवाय पर्याय नाही.हा काय देशाचा विकास आहे का? देशाला नागवं करून आपल्या तुंबड्या भरत अराजकतेकडे होत असलेली ही वाटचाल आहे.तरीही बडी वृत्तपत्रे आणि मिडीया यातील सहभागी तडीपार,गुन्हेगार राजकीय नेत्यांची कौतुके करण्यात व्यस्त आहेत.हा समाजधर्म आहे का? हे संत गाडगे बाबांच्या जयंतीदिनी त्यांनी शपथेवर सांगावे.तरीही मतलबासाठी खोट्यांचीच पोवाडे गाणाऱ्या अंधभक्तांनी डोळस होऊन याची उत्तरे दिली पाहिजेत….!
देशाच्या राजकारणात निर्माण झालेल्या ई.व्ही एम.संकटानेच आणि अनेक पोसलेल्या खोट्या ढोंगी बुवा बाबा आणि आणि गांधींचे मुखवटे घेतलेल्या खोटारड्या समाजसेवकांनीच येथील विपन्नावस्थेला खरी सुरूवात केलेली आहे.आता मात्र दड्या मारून बसलेले आहेत.ई.व्ही.एम.च्या तांत्रिक दुरूपयोगाने लोकांची एकगठ्ठा मते स्वत:कडे गैरमार्गाने खेचून सत्तेत बसणे.अनेक सरकारे संविधानाचा उपमर्द करून कोसळविणे,आपल्या भ्रष्ट आणि पापी षडयंत्रांकडे वक्र नजर टाकणाऱ्या देशातील विरोधी पक्षांना भुईसपाट करीत आपली अमर्याद सत्ता प्रस्थापित करणे.मिडीयाला गुलाम बनविणे आणि मतलबांच्या भिक मिळवण्यासाठी त्यांनीही नीतिमत्ता विसरून ते स्विकारणे.यातूनच स्वतःला सिकंदर म्हणून पुढे आणण्याचे ध्येय पूर्ण करणे ही एकच अघोरी महत्वाकांक्षी वाटचाल फक्त आज सुरू आहे.त्यासाठी जनतेच्या घामाचा पैसा बॅंकामधून पळविण्यास लूटारूंन मदत करून आपले आर्थिक वर्चस्व निर्माण करणारे घातकी राजकारण या देशात सुरू आहे.
महाराष्ट्रात स्वत:ला हिंदु हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे पाईक म्हणून गर्जना करणाऱ्यांबद्दल स्वप्नातही आज घडणाऱ्या घटनाक्रमाची कल्पना कोणी करू शकले नव्हते.त्यातून आपण काय वाईट करीत आहोत…. संविधानाची प्रतिष्ठा कमी करून लोकशाही संपविण्यासाठी कसे खतपाणी घालत आहोत…. याचेही वैषम्य वाटू नये एवढे कोडगे आणि स्वार्थी मावळे आपल्यासोबत असतील असं बाळासाहेबांनाही कधी वाटलं नसेल.अशी कथनी एक आणि करनी उफराटी करणारे बाळासाहेबांचे सेनापती भाजपाच्या हातात लागले.तेव्हापासून येथील राजकारणाला मिळालेली कलाटणी,निर्माण झालेले घटनात्मक पेचप्रसंग म्हणजे आगामी हुकूमशाहीची नांदी आहे की काय ही चिंता आज जनसामान्यांना ही भेडसावू लागली आहे.
निवडणूक आयोग,न्यायव्यवस्था आणि खोट्या चौकशा लावणाऱ्या स्वायत्त संस्था,प्रशासनातील काही अधिकारी हे सर्व फक्त सत्ताधाऱ्यांच्या ईशाऱ्यावरच चालत आहे. पात्रता नसलेल्या अनेक सोम्या गोम्यांना मिळालेली अधिकार पदे,निवृत्त न्यायाधिशांच्याही राज्यपाल वा तत्सम मोठ्या ठीकाणी झालेल्या नियुक्त्यांवरून हे सिध्द होत आहे.म्हणून न्यायव्यवस्थेत आपली प्रामाणिकता,नैतिकता,आणि घटनात्मक कर्तव्य सिध्द करून लोकशाही सृदृढ करण्याचे कर्तव्य बजावणारे अनेक न्यायाधिशही आज चिंतीत झालेले आहेत.ते फक्त प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या तेवढ्याच मिडीयाच्या समोर आज येत आहेत.न्यायाधिश लोकांच्याही सांगण्याला आणि पत्रांना जुमानले जात नाही. मग त्यांनाही पत्रकार परिषदांमधून देशातील जबाबदार प्रामाणिक नागरीकांना सावध करण्याचं कर्तव्य बजावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ७५ वर्षात भारतात जे घडले नव्हते ती दुर्मिळ आश्चर्ये आज येथे पहायला मिळत आहेत.काही थोडे घडले त्याला घटनात्मक आधार होते.आताचे थैमान घालणारे ,नाही नाही ते घडविणारे अनेक करामती किमयागार देशातील विरोधक संपवून येथे जनसामान्य,शेतकरी,श्रमिकांच्या जीवनाचे लिलाव करणारे सौदागर म्हणूनच पुढे येत आहेत.खोट्या घोषणांवर जनतेला मुर्ख बनवलं जातं आहे.
या देशातील शेतकऱ्यांना कुठेही बसलेत तरी त्यांच्या शेतातील मोटरपंप मोबाईलवरून बंद करता येतो. बॅंकाच्या खात्यातील पैसा कुठेलेही महत्वाचे तपशिल न देता उडविले जाऊ शकतात. ऑनलाईन परीक्षांमध्ये ही घोळ केले जाऊ शकतात.आपल्या निवडणूकांना पूरक ठरू शकतील असे पुलवामा सारखे हल्लेही घडविण्याची शक्यतांची ओरड जिथे होते आहे.तिथे मग ई. व्हि. एम. मशिन कुठूनही नियंत्रित किंवा हॕक केली जाऊ शकत नाही याची खात्री कोणत्या आधारावर दिली जाऊ शकते.वेळ मारून नेऊन आम्ही अत्यंत प्रामाणिक आणि तंत्रज्ञानातील निष्णात तज्ञ आहोत हे भासवून ईतरांना अडाणी समजणाऱ्यांनी दिलेले दाखले हे विश्वासार्ह असू शकत नाहीत.ते सुध्दा जनतेची दिशाभूल करणारे होते या निष्कर्षाप्रत येण्याला वाव आहे.बॅंकांच्या आर्थिक प्रणालीमध्ये घोटाळ्यांना प्रतिबंध करणारी मजबूत यंत्रणा आहे.तरीही बॅंकांमध्ये हस्तक्षेप करणारे सायबर चोर यशस्वी होतात. तशी अटकाव करणारी कोणती विशिष्ट यंत्रणा इ.व्ही.एम.साठी दिसत नाही. म्हणून निवडणूका ह्या इ.व्ही.एम.मुळेच जिंकल्या जात आहेत हे जळजळीत सत्त्य बॅलेट पेपरव्दारे नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूकांनी सुध्दा दाखवून दिलेले आहे.आपल्या हूशारीचा आणि फाजील आत्मविश्वासाचा आव आणणाऱ्यांना अगोदर तुमचे ई..व्हि.एम. हटवा आणि मग पहा तुमची औकात काय आहे,हे या छोट्या मॉडेलने दाखवून दिलेले आहे.अर्थात याला क्वचित एखादा असू शकतो.
म्हणून या देशातील जनतेने विकासाचे तिन तेरा वाजवून अदानी,अंबानी आणि पळून जाणाऱ्या ललित मोदींसारख्या चोरांच्या हातून जनतेचे जीवन संकटात आणण्याची अमानविय अघोरी महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या राजकारण्यांना धडा शिकविला पाहिजे.त्यासाठी आपली हक्काची मते ई.व्हि.एम. व्दारे वाममार्गाने पळविणाऱ्यांना खरे देव दाखविण्यासाठी या प्रणालीविरूध्द प्रचंड जनआंदोलन घडविण्यासाठी पुढे आलं पाहिजे.बॅलेट पेपरनेच या देशात निवडणूका झाल्या पाहिजेत.जर हे जन आक्रोश लक्षात घेण्याची संवेदनशीलता दाखविली नाही तर मतदानांवरच आता बहिष्कार घातले गेले पाहिजेत…! तेव्हा वेळ जाण्यापूर्वीच उठा…पाप्यांना हद्दपार करून लोकशाही वाचविण्याच्या जन आंदोलनात सहभागी व्हा….! काळ तुमची वाट पाहतो आहे….! नियतीलाही हे असह्य होते आहे…म्हणून ती सुध्दा खुणावते आहे…आणि संदेश देत आहे….की *”ई.व्ही.एम.हद्दपार केल्याशिवाय तुम्ही या देशातील लोकशाही वाचवू शकणार नाही….!”* हुकूमशाहीकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची जनतेच्या छाताडावर नाचण्याची अघोरी स्वप्ने भंगविली जाऊ शकणार नाहीत...! म्हणून हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांचा आदर्श समोर ठेऊन देशातील जनतेने प्रचंड संघटन शक्तीने समोर येण्याशिवाय आता पर्याय नाही….! नाहीतर येणारी पीढी,बेजबाबदार, अपराधी समजल्याशिवाय राहणार नाही….!