आशाताई बच्छाव
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारत हा जगातील सर्वात मोठा यशस्वी लोकशाही अंमलात आणणारा देश
पालघर ,/वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क : स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही चतुसुत्री भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केल्यामुळे आज भारत हा जगातील सर्वात मोठा यशस्वी लोकशाही अंमलात आणणारा देश ठरला असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी गोंविद बोडके यांनी व्यक्त केला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ, पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार श्रीनिवास वनगा, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा उज्वला काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, संदीप पवार, प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, तसेच जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.
देश स्वतंत्र झाल्यावर देश चालविण्यासाठी लागणारे संविधान निर्मितीसाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील घटना मसुदा समितीने राज्यघटना तयार केली. या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करुन भारत देशाला मजबूत संविधान दिले.
दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान संपूर्ण भारत देशात स्विकारण्यात आले व 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशामध्ये अंमलात आणण्यात आले.
त्यानंतर लोकशाहीचे एक नवे पर्व सुरु झाले. आपला भारत देश सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक देश बनला, आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास मुलभूत हक्क व अधिकार आणि कर्तव्य दिलेले आहेत. असे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.
1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा निर्माण करण्यात आला.
पालघर जिल्हा हा सागरी, नागरी व डोंगरी अशा भौगोलिक विविधतेने नटलेला जिल्हा असून त्याचबरोबर वाढते औद्योगिकरण, नागरीकरणामुळे पालघर जिल्हा मुंबईच्या बरोबरीने राज्याच्या विकासात योगदान देत आहे. पालघर जिल्ह्यातील आदीवासी बांधव हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील आपल्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना दिसून येतो.
तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना पारंपारीकतेची कास धरुन तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःची उन्नती करताना दिसून येतो ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
सांस्कृतिक व भौगोलिक वैशिष्ट्ये असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये थंड हवेचे ठिकाण असलेल्या जव्हार येथील पुरातन कालीन राजवाडा, 115 कि.मी. चा अतिविशाल समुद्रकिनारा, सुप्रसिध्द सातपाटी बंदर, चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेला अर्नाळा किल्ला, केळवा, डहाणू, बोर्डी व चिंचणी येथील प्रसिध्द समुद्रकिनारे, जीवदानी डोंगरावरील जिवदानी देवीचे प्रसिध्द मंदिर व चारोटी, ता. डहाणू येथील महालक्ष्मी देवीचे मंदिर या सर्व सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे पालघर जिल्ह्याची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे.
पालघर जिल्ह्याची ओळख साहित्यीक, सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य संग्रामात अनमोल असे योगदान दिलेला जिल्हा म्हणून कायम राहिली आहे. आदिवासी संस्कृतीची ओळख असलेली वारली चित्रकला ही जगभरात पोहोचवणारे पद्मश्री स्वर्गीय जिव्या सोम्या म्हसे यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनातील स्थित्यंतरे (बदल) जगभरात पोहोचवून आदीवासी संस्कृतीचा सन्मानच केला असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.