आशाताई बच्छाव
जयगड-उंडी फाट्यावर झालेल्या दुचाकी व स्कूलबसमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड- उंडीफाट्यावर आज बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास स्कूलबस व दुचाकीस्वारामध्ये झालेल्या भीषण अपघातात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. स्वप्निल सुरेश गुरव (वय वर्षे 35 राहणार मालगुंड बाजारपेठ) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्निल गुरव हा मालगुंड येथून जयगड येथे एका खाजगी कंपनीमध्ये कामाला जात होता आपल्या कंपनीतील काम आटपून दुपारी तीनच्या सुमारास जयगडवरून मालगुंडकडे येत असताना खंडाळ्याहून जयगडकडे जाणाऱ्या स्कूलबसच्या चालकाने जयगड उंडी फाट्यावर दुचाकीला जोरदार धडक दिली. या दोघांमध्ये झालेल्या धडकेत स्वप्निलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वाराला धडक दिलेल्या स्कूल बसचालकाचे नाव सागर सुभाष खाडे राहणार जयगड असे आहे.
याबाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत. दरम्यान आकस्मिक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे स्वप्निलच्या कुटुंबावर मोठी शोककाळा पसरली आहे स्वप्नील च्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, बहीण असा परिवार आहे त्याच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीतील त्याचा मित्रपरिवार, आणि प्रतिष्ठित नागरिक तसेच त्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा झाले होते.
या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचा मृतदेह नेण्यात आला असून शवविच्छेदन प्रकिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेचा पंचनामा घटनास्थळी जयगड पोलिस ठाण्याकडून करण्यात आला आहे.