आशाताई बच्छाव
पुराच्या पाण्याचा खाडीभागातील सुमारे पंधरा ते सोळा गावांना वेढा ! रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवार दुपार पासून पुन्हा धुवांधार बॅटिंग सूरू केल्याने ओसरू लागलेले पुराचे पाणी वेगाने भरत जाऊन खाडीभागाला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, फुणगूस जुना बाजारपेठेत पाच ते सहा फूट पाण्याची पातळी आहे. खाडीलगत असलेल्या भातशेतीत पाणी जाऊन हातातोंडाशी आलेले उभे भातपीक तब्बल अठेचाळीस तासाहून अधिक काळ पाण्याखाली आहे. पावसाचा जोर आणि तेवढ्याच वेगाने पाणी भरण्याचा वेग आज पुन्हा लोकं
धास्तावले असल्याचे चित्र परिसरात आहे.
पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर गेले चार दिवस सुरू झालेल्या पावसामुळे फुणगूस येथील शास्त्री खाडी दुथडी भरून खाडीभागात पुरसदृशय परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र जलमय परिस्थिती व जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गतवर्षीच्या महापुराची पुनरावृत्ती होणार की काय या भीतीच्या छायेत येथील जनता वावरत आहे. सोमवारी सकाळी पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली व पुराचे पाणीही ओसरु लागले. चार दिवसानंतर खाडीभाग जनतेला सूर्यदर्शनही झाले. त्यामुळे पुराची धाकधूकही कमी झाली होती.
मात्र सूर्यदर्शन व पुराची कमी झालेली धाकधूकही काही तासापुरतीच म्हणावी लागेल. सोमवारी दुपारपासून आतषबाजी करत पावसाच्या जोरदार अविश्रांत धारा बरसू लागल्या आणि काही प्रमाणात ओसरून कमी झालेल्या पाण्यानेही कमालीचा वेग धारण करून हाहा म्हणता आज मंगळवार सकाळपर्यंत आधी भरलेल्या पुराच्या पाण्याची सीमा ओलांडून खाडीभागातील सुमारे पंधरा ते सोळा गावाना वेढा घातला. फुणगूस जुना बाजारपेठ येथे सकाळी नऊ वाजेपर्यंत सुमारे पाच ते सहा फूट पाणी होते. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्याचे वहाळ झाले होते. या रस्त्यावरून पादचाऱ्यांना मार्ग काढताना कसरत करावी लागत होती. सर्वत्र झालेल्या जलमय परिस्थिमुळे येथील जनजीवनावरही परिणाम झाला आहे. डिंगणी-संगमेश्वर रस्त्यावर काही ठिकाणी पाणी आल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दांडी मारण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
परचुरी, फुणगूस, कोंडये, डावखोल, मांजरे, मेढे, डिंगणी, पिरंदवणे, करजुवे आदी गावातील खाडीलगत असलेल्या भात शेतीला पुन्हा एकदा पाण्याने गिळंकृत केले. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक निसर्ग हिरावून नेणार की काय अशा अवस्थेत येथील शेतकरीवर्ग आहे. नेहमी प्रमाणे महावितरणनेही लपाछुपीचा खेळ सुरू केला होता.
पावसाचा जोर आणि पाणी भरण्याचा वेग अजूनही सुरू असल्याने पुन्हा येथील जनतेच्या मनात गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी जाग्या झाल्यात आहेत.