आशाताई बच्छाव
भास्कर जाधवांची घसरली जीभ; राज्यपालांना म्हटलं ‘घरगडी’ रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची जीभ घसरली. भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा घरगडी असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते.
भगतसिंग कोशारी यांच्या महाराष्ट्राबाबत विरोधातील वक्तव्यावरुन टीका करताना भास्कर जाधव यांचा संयम सुटला. त्यांनी एकेरी शब्दाचा उल्लेख करत घरगडी शब्द वापरल्यामुळे कामगारांना कमी लेखून त्यांच्या भावना दुखावल्याचे बोलले जात आहे.
यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. तसेच संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवरही टिपण्णी केली. राज्य सरकारच्या मंत्री मंडळाच्या विस्तारावर खोचक टिका केली. ते म्हणाले की, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही, आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले. आता बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचेच राबवतायत. म्हणून मंत्रीमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अश्या माझ्या शुभेच्छा आहेत’ असेही ते बोलले.
यापुढील शिवसेनेची लढाई खुल्या मैदानात होईल. एकाने दुसऱ्याला गिळावे, दुसऱ्याने तिसऱ्यास गिळावे हाच जगाचा न्याय खरा, हिच जगाची परंपरा…’ तू जपून टाक पाऊल जरा, तू जपून टाक पाऊल जरा,’ असेही जाधव पुढे म्हणाले.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिलं होतं. पाच ऑगस्टपर्यंत ईडीकडे त्यांनी वेळ मागितला होता. अधिवेशन संपल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी हजर राहतो, असं सांगितलं होतं. पण राऊतांच्या पत्राला कोणतंही उत्तर न देता, लोकसभेच अधिवेशन सुरू असताना संजय राऊत यांना ईडीने अटक केली, असा आरोप भास्कर जाधवांनी यावेळी केला.