राजेंद्र पाटील राऊत
बाप(जागतिक पालक दिन) वाचकहो,आज जागतिक पालक (बाप) दिन! बाप कुणाला म्हणावे?या गहन प्रश्नांसोबतच आजच्या लेखाचा शब्दपसारा मांडत आहोत.तसं बघितले तर बापाचे अनेक प्रकार आहेत.दतक घेऊन पालन करणारा बाप,जन्म देणारा बाप,आणि कर्तृत्व व दातृत्व समजून झटणारा बाप! यात सर्वश्रेष्ठ बाप कोणता? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.येथे खर तर असही लिहता येईल की,आपले जीवन व भविष्य घडविणारा बापच हा श्रेष्ठ असतो.श्रीमंत सयाजीराव महाराजांना दतक घेऊन त्यांचे भविष्य घडविणारे बडोदा संस्थानचे खंडेराव महाराज गायकवाड हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.तर यशवंतला दतक घेणारे महात्मा ज्योतिबा फुलेसुध्दा त्याच पध्दतीने आजच्या युगात सर्वश्रेष्ठ ठरतात.बाप म्हणजे तरी काय?फक्त जन्माला घालून बाप बनणे अगदीच सोपे.मात्र त्या मुलांच्या प्रती आपले असलेले कर्तृत्व व दातृत्व जो स्विकारतो तो खरा बाप!पण आजकालची व्याख्या बदलत चालली ज्या बापाने जन्म दिला त्याला घराबाहेर हुसकावून लावणारी हरामी औलाद पैदा व्हायला लागल्यावर बाप फक्त नावालाच उरला.मग तो संगोपन करुन वाढविणारा व मुलांचे भविष्य घडविण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचाही विचार न करता पावलोपावली ठोकरा खाऊन धडपडत राहून मुलांचे आरोग्य ,शिक्षण ,खाणापान,व त्यांचे भविष्य घडविण्यासाठी स्वतः उपाशीपोटी फिरुन खस्ता खात राहतो.तो बाप तर कुणाच्याही खिजगणतीत नसतो,आपल्या मानसपुत्रांना कुणासमोर लाचारी करावी लागू नये म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानून मुलांना सुखी ठेवणारा बाप जरी विरळच असला,तरी आजच्या जमान्यात अशा बापाने आमच्यासाठी काय केले?याची जाणीव ठेवणारी मानसपुत्रांची संख्या कमीच आहे.लहानपणीच आमचा बाप मेला तेव्हा आमच्या या पडद्यामागील बापाने स्वतःच्या गरजा बाजूला ठेऊन प्रसंगी स्वतः जुने फाटके कपडे वापरुन आणि झळ सोसत मानसपुत्रांना मात्र स्वाभिमानाने जगणे व ऐषोआरामात राहणे शिकविणा-या अशा बापाची किंमत समाजातल्या किती जणांना आहे?हा एक चिंतेचा विषय ठरतो.एक तो बापच असतो,मुलांच्या सुखासाठी भविष्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करतो.मग तो जन्म देणारा बाप असो,की दतक घेणारा बाप असो अथवा पडद्यामागील बाप असो.पण त्या बापाची खरी किंमत कधीच कुणाला कळत नाही.मुले तारुण्यात व वयात आल्यावर नेमके हेच विसरतात की,आमच्या जीवनासाठी व आयुष्य सुखाचे जावे म्हणून कुणी आयुष्याची होळी पेटवून आपले जीवन उध्वस्त केले.आज मुलांच्या हाती हजारो रुपये किंमतीचे मोबाईल,महागडया गाडया,छानछोकीचे कपडे,व मन लागेल तसे जेवण,राहण्यासाठी उंची श्रीमंतीचा दिखावा.व आपल्याच दोस्तांत व नातेवाईकात मिजासखोरी व मोठेपणा मिरविण्यासाठी हे पुरेसे ठरते.मात्र ज्या बापाच्या त्यागातून व घामातून हे साम्राज्य उभे राहिले.त्या बापाला मात्र आम्ही सोयीस्करपणे विसरतो.पण…दुःखाची बाब एवढीच असते की,जो बाप आपल्या मुलांसाठी दुनियेसाठी लढून झगडून अविश्रांत कष्ट करुन फक्त त्यांच्या चेहऱ्यावर सुखाची आनंदाची एक लकेर बघण्यासाठी स्वतःच्या आयुष्यासोबत आपली कुठलीही पर्वा न करता एवढा मोठा जुगार खेळतो.त्या मुलांनी तरी निदान बापाच्या त्यागाचे मोल कधी समजून घेतले पाहिजे?हा मोठा यक्षप्रश्न आहे.परंतु नाईलाजाने एवढेच म्हणावे लागते.”पेड लगाया बबुल का तो आम कहा से खाये”हिच आजच्या बापाची अवस्था आहे.तरीही मजबुरीने नाईलाज म्हणून आज जागतिक पालकदिन साजरा केला जातो हिच मोठी शोकांतिका आहे! ✍️ राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युज