राजेंद्र पाटील राऊत
५६ गाव पाणीपुरवठा योजना बारगळली ऐन पावसाळ्यातही कौळाणे,व-हाणे गावे तहानलेलीच! (स्पेशल रिपोर्ट-राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्याच्या दक्षिण भागात समाविष्ठ असलेल्या मालेगांव तालुक्यातील व नांदगाव तालुक्यातील ५६ खेडी आजही पिण्याच्या पाण्याअभावी कासावीस होत आहेत.
ब्रिटिश सरकारच्या अर्थसहाय्यातून राबविण्यात आलेली ही पाणीपुरवठा योजना सपशेल फेल ठरलेली आहे.ब्रिटिश सरकारच्या मदतीवर गिरणा धरणातून सुरु केली गेलेली ही ५६ खेडी पाणीपुरवठा योजना पुढे नाशिक जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली खरी;मात्र या योजनेचे नव्याचे नऊ दिवस स्वागत झाले.मात्र या योजनेतून नागरिकांना पिण्यासाठी मुबलक पाणी कधी उपलब्ध झालेच नाही.आज रोजी गिरणा धरणातून मालेगांव शहराला व नांदगाव शहरासह ५६ खेडयांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.त्याशिवाय दहिवाळसह १२ गाव पाणीपुरवठा योजनाही याच गिरणा धरणावर अवलंबून आहे.तर जळगाव जिल्ह्याला शेतीसाठी याच धरणातून पाणीपुरवठा होतो खरा…मात्र ब्रिटिश सरकारच्या मदतीवर राबविलेली अब्जावधी रुपये खर्च झालेली ५६ गाव पाणीपुरवठा योजना आज तरी फक्त नावालाच उरलेली आहे.व गावागावात उभारण्यात आलेले जलकुंभ (पाण्याच्या टाक्याही) फक्त शोभेच्या वस्तू म्हणून दिमाखात उभ्या आहेत.अनियंत्रित व अधून मधून कधी तरी होणारा ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेचा सर्वसाधारण तांत्रिक अभ्यास केला तरी असे लक्षात येते की,बहुतांशी ग्रामपंचायतीनी पाणीपुरवठ्याचे बिलेच जिल्हा परिषदेला अदा न केल्यामुळे ही भयानक परिस्थिती उदभवली आहे.ऐन पावसाळ्यातच सयाजीराव महाराजांचे जन्मगांव कौळाणेतही नागरिकांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे.प्रति हंडा ५०/६० रुपये दराने विकतचे पाणी पिण्याची ही वेळ उदासीन लोकप्रतिनिधी व निष्क्रिय असलेल्या गाव पुढा-यांमुळे निर्माण झाली आहे,हे वास्तवतारुपी सत्यता नाकारता येणार नाही.शेजारील पाच मारुतीचे व-हाणे येथीलही परिस्थिती काही वेगळी नाही.दोन दोन महिने उलटूनही या गावात पिण्याचे पाणी मिळत नाही परिणामी गावातले लोक एक तर बिस्लरीच्या बाटल्यांचे पाणी पिणे पसंत करतात अथवा मालेगांवहून पिण्यासाठी पाणी नेतात.ही स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी ७५ वी साजरी करत असताना शोकांतिकाच म्हटली पाहिजे.एक मात्र खरे की,मालेगांव व नांदगाव तालुक्याच्या सीमारेषेवर असलेले गिरणा धरण जवळ असूनही “धरण उशाला कोरड घशाला” असे म्हटले तर काहीच अतिशयोक्तीचे ठरणार नाही.