राजेंद्र पाटील राऊत
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य कुटुंबात जाऊन घेतले रात्रीचे जेवण
परभणी:-शत्रुघ्न काकडे पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क
सर्वधर्म समभाव या विचारांची रुजवणूक नागरिकांनी करावी यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रत्नापुर येथील अंबादास घाडगे या सर्वसामान्य कुटुंबात जाऊन रात्रीचे जेवण केले. त्यानंतर सुमन घाडगे यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल व सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांचे कुंकु लावून औक्षण केले. हा भारतीय संस्कृतीचा सोहळा उपस्थित अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांकरीता कृतज्ञता व्यक्त करावा असाच होता.मानवत तालुक्यातील रत्नापुर येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता अमृतमहोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याची जनजागृती हा कार्यक्रम जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.यावेळी व्यासपीठावर शहर पोलीस प्रमुख अविनाश कुमार, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार सारंग चव्हाण, शासकीय अभियोक्ता डी. यु. दराडे, पोलीस निरीक्षक बनसोडे, नायब तहसीलदार नकुल वाघुंडे, सरपंच सचिन दोडके, अँड. भारत चिलवंत यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या की, भारत देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानास स्वातंत्र्य, समता, बंधुता नागरीकांमध्ये आत्मियतेने आली पाहिजे असे अभिप्रेत आहे. त्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावातील नागरीकांनी एक गाव एक स्मशानभूमीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.
सर्व सुविधा मिळण्यासाठी व आत्मनिर्भरपणे जगण्यासाठी प्रत्येकाने कायद्याचा लाभ घेतला पाहिजे पण कायद्याचा कुठेही गैरवापर होता कामा नये, ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पार पाडावी. रत्नापुर या गावात मागील • काही दिवसात अनुसूचित जाती अत्याचार बाबत अनेक प्रकरणे घडली त्यामुळे हे गाव संवेदनशील गावाच्या यादीत आले. पण येथील सर्व धर्म समभावाचे वातावरण पाहुन मी समाधानी झाले. पण आगामी काळात रत्नापुरसह सर्वच गावातील ग्रामस्थांनी एक गाव एक स्मशानभूमीसाठी पुढाकार घेतला तर अनेक समस्या कमी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच आयुष्यात प्रत्येकाने थोर महापुरुषाचे आत्मचरित्र वाचुन ते आचरणात आणले पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी शासकीय अभियोक्ता डी. यु. दराडे यांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली. शासकीय निवासी शाळा मानवत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्वधर्मसमभाव या पथनाट्ये उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेत टाळ्या मिळविल्या.यावेळी अँड. भारत चिलवंत यांनी रत्नापुर येथे यापुढे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रकरण होणार नाही अशी ग्वाही सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासनाला दिली. युवती, विद्यार्थी व ग्रामस्थांशी संवाद साधुन समस्या व इतर बाबीवर जिल्हाधिकारी गोयल यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. सुत्रसंचालन साळेगावकर यांनी केले तर होगे यांनी आभार मानले.




