राजेंद्र पाटील राऊत
राज ठाकरे। ईडीच्या पिंजऱ्यातील पोपट……..! वाचकहो,मराठा आरक्षण न्यायालयात अडकवून ठेवलंय, ओबीसी आरक्षणाचा बळी घेतलाय, एसी/ एसटीचे सर्व प्रकारचे आरक्षण खाजगीकरणाच्या नावाखाली बंद झालंय. बापाने सावकारी कर्ज घेवून मुलांना शिकविले. शिक्षण घेतलेली बहुजन समाजातील ती मुलं नोकरीच्या शोधात दरदर भटकत आहेत. सरकारी नीती अन धोरणांमुळे रोजगारच गायब झालेत.मग या मुलांना रोजगार कुठून मिळणार ?अशा या रिकाम्या डोक्याच्या व मोकळ्या हाताच्या पोरांना मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधातील कार्यक्रमाची ब्लु प्रिंट राज ठाकरे यांनी दिली आहे. भोंगे काढले नाहीत, तर मशिदीसमोर हनुमान चालिसा लाऊडस्पीकर लावून म्हणायचा असे आदेश आहेत, या बहुजनांच्या मुलांनी त्याचा अंमल ही सुरू केलाय. बाप, त्याने खाल्लेल्या खस्ता अन आपल्याला दिलेले शिक्षण या साऱ्या गोष्टी धर्माच्या अफूमुळे डोक्यातून गायब झाल्या आहेत. ही नशाच भारी आहे. भोंगे अन मशिदच त्यांच्या डोक्यात बसलीय. आपल्याला रोजगार या भोंग्यांमुळे मिळत नाही, आपली ही अवस्था या भोंग्यांमुळेच झालीय, अशी त्यांची धारणा झालीय. धर्म वाचला तर तुम्ही वाचाल. रोजगाराचे काय घेऊन बसलात. हे बहुजनांच्या गळी उतरविण्यात इथली ब्राह्मणी व्यवस्था सतत यशस्वी ठरत आहे. बहुजन समाजाला धर्माच्या नावाखाली उध्वस्त करणारे धर्माचे ठेकेदार, त्याचे दलाल, भडवे व बडवे यांचेच आपण सतत ऐकत आलो. त्यामुळे हजारो वर्षे हेच भडवे, दलाल, व्यववस्थेचे ठेकेदार राज्य करीत आहेत. शहिद भगतसिंग यांनी ” मी नास्तिक …” या आपल्या पुस्तकात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, त्यातील नंगानाच, अन मशिदीच्या परस्पर संबंधा विषयी लिहिले आहे. धर्मांध लोक आपल्यापोळी भाजण्यासाठी धार्मिक भावनांचा फायदा घेत मंदिर – मशिद, हिंदू – मुस्लिम असा वाद, वातावरण निर्माण करतील. आपली डोकी भडकवतील. ती भडकवू देवू नका. धर्मांधांच्या षडयंत्राला बळी पडू नका. हेच भगतसिंग यांनी सांगितले आहे. पण या देशातील बहुजन वर्गाने शहिद भगतसिंग वाचला नाही,स्वीकारला नाही. त्यामुळे अशा राजकीय सुपाऱ्या घेणाऱ्याचे फावते आहे. बाकी ईडीच्या पिंजऱ्यातील पोपट राज ठाकरे यांची सभा, तिचे नियोजन, त्यांचे भाषण, त्यातले मुद्दे, कार्यक्रम सर्व सर्व प्रायोजित होते. इतकेच काय उसळलेली गर्दी, गर्दीचे गरम केलेले खिसे, गर्दीला वाहून नेणाऱ्या शेकडो गाड्या सर्व प्रायोजित होते.अन सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले भोंगे ही प्रायोजियतच होते, राजकारणाचा धंदा यालाच म्हणतात.
रंगनाथ (दादा) चोपडे.(अतिथी संपादकीय)