राजेंद्र पाटील राऊत
अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची मदत मिळणार?
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मराठवाड्यासह काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. गुलाब चक्रीवादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जबरदस्त बसला आहे. दरम्यान, राज्यातील या परिस्थितीची मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या विभागाकडून आढावा घेतला.
मराठवाड्यातील 22 लाख हेक्टर शेती उद्धवस्त झाल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ओला दुष्काळ जाहीर करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील शेतीची स्थिती पाहता विरोधक सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. पंचनामे होत राहतील. आधी शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना मदत द्या, अशी आक्रमक मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करणार
राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले. राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.