नेर्ले : अरबी समुद्रामध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्ज पी-३०५ या जहाजावरील ३०० कामगारापैकी भारतीय नौदलाने आतापर्यंत १८८ जणांची सुखरूप सुटका केली आहे. तर आतापर्यंत ६० कामगारांचा मृत्यू झाला असून अजून काही बेपत्ता आहेत. याच जहाजावर काळमवाडी ता. वाळवा येथील निखिल कैलास सुपनेकर हा तरुण सात महिन्यांपासून टँकर वेल्डर म्हणून कार्यरत आहे. चक्रीवादळामुळे अँकर तुटून बोट क्रॅक झाल्याने बोटीत पाणी शिरले परंतु दिवसभर वादळ कमी होण्याची वाट बघत सर्वजण बोट पकडून उभे होते. १७ मे सायंकाळी पाचच्या दरम्यान बोट बुडण्यास सुरूवात झाली. ज्यांना पोहता येत होते, त्यांनी लाईफ जॅकेट घालून उड्या मारल्या तर काही जण बोटीबरोबर पाण्यात बुडाले. मात्र या उडी मारण्यामध्ये निखिल सुपनेकर हा २५ वर्षीय युवक देखील होता.
चक्रीवादळामुळे समुद्रात प्रती सेकंद होणाऱ्या ३६ फुट उंच लाटा, ताशी १८० वेगाने वाहणारे वारे, विजांचा कडकडाट, धुवाधार पाऊस व गडद काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीशी निखिल सलग १९ तास पाण्यात झुंज देत होता. दि. १८ मे रोजी दुपारी एक च्या दरम्यान भारतीय नौदलाने हेलिकॉप्टरमधून त्याला पाहिले व गुजरातच्या सिमेवरील रेस्क्यू बोटच्या गरम रूममध्ये अठरा तास ठेवण्यात आले त्यानंतर १८ मे रोजी रात्रभर मुंबईतील एका रुग्णालयात ठेऊन शुक्रवारी दि. २१ रोजी काळामवाडी येथील त्याच्या घरी सोडले.
सामान्य कुटुंबातील असणाऱ्या निखिलने आयटीआयमधून वेल्डरचा कोर्स केला होता. त्याला सात महिण्यापुर्वी मुंबई मधील मॅथ्यू अस्फोटेक या कंपनीमध्ये वेल्डर या पदावर काम मिळाले होते. घरी आई, वडील, एक भाऊ व लहान बहिण असा परिवार आहे. गावी सुखरूप पोहचल्या नंतर सरपंच व ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले.