राजेंद्र पाटील राऊत
बियाणांच्या परिपूर्ण वितरणासाठी मंत्रालयीन पातळीवर लवकरच धोरणात्मक निर्णय – पालकमंत्री अशोक चव्हाण
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
जिल्ह्यातील पेरणीमध्ये असलेली विविधता, विविध पिकांसमवेत सोयाबीन पिकांकडे शेतकऱ्यांचा अधिक असलेला कल कृषी विभागाने लक्षात घेणे आवश्यक आहे. गतवर्षी सोयाबीन पेरणीमध्ये जी आव्हाने निर्माण झाली ती लक्षात घेता या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणांची सहज उपलब्धता व्हावी यासाठीही दक्षता घेतली पाहिजे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात एकूण सोयाबीन बियाणांची अपेक्षित मागणी लक्षात घेता जवळपास 50 हजार क्विंटल कमतरता दिसून येत आहे. ही कमतरता येत्या पेरणीपुर्वी पूर्ण करण्याचे कृषी विभागातर्फे नियोजन जरी केले जात असले तरी यातील संभाव्य आव्हाने लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणांसाठी त्रास होवू नये या उद्देशाने मंत्रालयात कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून मार्ग काढू असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगामाची आढावा बैठक आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहन हबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, अधिष्ठाता दिलीप म्हेसेंकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदि मान्यवर उपस्थित होते.