आशाताई बच्छाव
वीजग्राहक आपले दैवत; त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा द्या
सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांचे आवाहन
जालन्यात वीज कर्मचाऱ्यांशी संवाद मेळावा उत्साहात
जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: वीजग्राहक आपले दैवत आहेत. त्यांना अखंडित वीजपुरवठ्यासह सर्वोत्कृष्ट सेवा द्या. तसेच वीजबिलांच्या 100 टक्के वसुलीसह वीजचोरी रोखण्याकडेही कटाक्षाने लक्ष द्या, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी केले.
जालन्यातील मातोश्री लॉन्स येथे शनिवारी (10 मे) जिल्ह्यातील जनमित्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी औंढेकर बोलत होते. या कार्यक्रमास अधीक्षक अभियंता संजय सरग, प्रभारी उपमहाव्यवस्थापक चंद्रकांत खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना औंढेकर म्हणाले की, जनमित्र (लाईनमन) हा महावितरणचा चेहरा आहे. सर्व जनमित्रांनी नेहमी गणवेशात रहावे. त्यामुळे जनमानसात सकारात्मक संदेश जातो. कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने दिली जातील. कर्मचाऱ्यांनी विद्युत यंत्रणेवर काम करताना त्याचा कटाक्षाने वापर करावा.
जालना जिल्ह्यात उच्चदाब ग्राहकांकडून सर्वाधिक महसूल जमा होतो हे भूषणावह आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना दैवत मानून त्यांची इमानेइतबारे सेवा करा. ग्राहकांना सुरळीत वीज व सर्वोत्तम सेवा दिली तर वीजबिल वसुली करणेही सोपे जाते. यावेळी मार्च महिन्यात केलेल्या वीजबील वसुलीचे कौतुक करत, गावांची थकबाकी शून्य केलेल्या तीन जनमित्रांचा औंढेकर यांनी सत्कार केला. वीजबिल वसुलीवरच महावितणचा डोलारा उभा आहे. त्यामुळे प्रत्येक महिना हा मार्च समजूनच प्रत्येकाने कार्यरत रहायला हवे, अशा सूचना त्यांनी केल्या.






