*कोल्हापूरात जिल्ह्यात कोरोना अटोक्यात*
*युवा मराठा न्यूज*
कोल्हापूर जिल्ह्यातील
‘मास्क नाही दुकानात प्रवेश नाही’ या जिल्हा प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २०५ होती, ती २९ ऑक्टोबरपर्यंत ५५ वर आली आहे.
दररोज आठशे ते एक हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची पडणारी भर… हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नव्हते… रोज ३० ते ३५ मृतांची संख्या… स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही जागा मिळत नव्हती.
कोरोनाच्या भयंकर विळख्यात कोल्हापूर जिल्हा अडकला होता; पण आता काहीसा दिलासा मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची लाट सुरू झाली, ती एप्रिल महिन्यात. सुरुवातीला कोल्हापूर शहर व जिल्ह्यात एक-दोन बाधित रुग्ण आढळले, की नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. लॉकडाऊन काळात परराज्य व अन्य जिल्ह्यांतील नागरिकांची वाहतूक सुरू झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. यात कोल्हापूर शहर आघाडीवर होते. शहरात एकट्या राजारामपुरी परिसरात ५०० ते ६००रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकही असा तालुका शिल्लक राहिला नाही, जेथे कोरोना रुग्ण आढळला नाही.
मे व जून महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली. यावेळी जिल्ह्याने २५ हजारांवर रुग्ण बाधित झाले. मृतांची संख्या ५०० वर गेली होती. दररोज आठशे ते एक हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत होती. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज होती. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते, तर स्मशानभूमीत मृतदेहांचे दहन करण्यास जागा उपलब्ध होत नव्हती.
यानंतर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपरिषद, ग्रामपंचायत पातळीवर सक्तीने नियमांचे पालन करण्यास भाग पडले गेले. केंद्र
सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्यानंतरही स्थानिक जिल्हा प्रशासनाने आपल्या पातळीवर निर्णय घेत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला.
ग्रामीण भागात जनता स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करू लागली. कागल, गडहिंग्लज, गारगोटीसारख्या भागात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. खेडेगावात वाड्या-वस्त्यांवर परगावच्या व्यक्तीला गावात प्रवेश बंदी करण्यात आली. त्यातूनही कोणी आले, तर सक्तीने स्वॅब तपासणी करायला भाग पाडले. याचा परिणाम आज दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आज ती ५५ वर आली आहे. कोरोना रुग्णांची घटती संख्या गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाशी लढणार्या जिल्हावासीयांना दिलासा देणारी ठरली आहे.
मोहन शिंदे जिल्हाप्रतिनिधी
कोल्हापूर .