राज्यात येणारे पाच ते सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
पुणे, दि.२१ – राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस पडेल. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटा सह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यातच बंगाल उपसागराचा पश्चिममध्य भाग व आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पाऊस वाढणार आहे. (ता.१९ पासून) ठाणे,
पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तर (ता.२०) संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (ता.२१) जळगाव, परभणी हिंगोली वगळता राज्यात सर्वत्र तर, गुरूवारी (ता.२२) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.