आशाताई बच्छाव
सोनईतील संजय वैरागर अमानुष मारहाण प्रकरणी दलित संघटनांचे तीव्र निदर्शने — आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
नेवासा (प्रतिनिधी कारभारी गव्हाणे / दिपक कदम):
नेवासा तालुक्यातील सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याला जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी अमानुषपणे मारहाण करून डोळा व पाय फॅक्चर केला आहे त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी बौद्ध, मातंग, ख्रिश्चन व चर्मकार समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
ही निदर्शने रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या वेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना भाजपचे बंडूकुमार शिंदे,अनुसूचित जाती मागासवर्गीय सेल भाजप तालुका अध्यक्ष विजय शेलार, ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम व चर्मकार महासंघाचे राज्य सचिव संतोष कांबळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
या वेळी बोलताना भाजप नेते बंडू शिंदे म्हणाले, “संजय वैरागर याला जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी अमानुषपणे मारहाण करून त्याचे हात फॅक्चर केले व डोळ्यात चाकू खुपसला. ही घटना अत्यंत निंदनीय असून आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे.”
अनुसूचित जाती मागासवर्गीय सेल भाजप तालुकाध्यक्ष विजय शेलार यांनी सांगितले की, “संजय वैरागर याच्या मारेकऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये सडवले पाहिजे. अशाच कठोर कारवाईमुळे अत्याचारांना आळा बसेल.”
रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात दलितांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. त्यामुळे हा जिल्हा ‘दलित अत्याचारग्रस्त जिल्हा’ म्हणून घोषित करावा. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत; मात्र आरोपींना अटक करून कठोर कारवाई न केल्यास दलित संघटना उग्र आंदोलन छेडतील,” असा इशारा त्यांनी दिला.
या निदर्शनात रिपाई शहराध्यक्ष विजय पवार, ख्रिश्चन समाजाचे नेते सुरेश ठुबे, बसाबाचे सुनील मगर, विठ्ठल गालफाडे, आकाश शेंडे, रिपाईचे युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर दीपक भांड, रावसाहेब आल्हाट, विशाल शिरसाट, बाबासाहेब पवार, बाबासाहेब भालेराव, आकाश गायकवाड, किरण भोसले, किशोर अभंग, आशिष मोरे, राजेंद्र बोरकर, प्रवीण वैरागर, गणेश शिंदे, किशोर फाजगे, विजय उमाप व दीपक बिरंजी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित मित्र बाबासाहेब शेलार यांनी केले, तर आभार अमोल कुमार मिसाळ यांनी मानले.






