आशाताई बच्छाव
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) जालना विधानसभेची लढत ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. आपण जनशक्तीचे उमेदवार असल्यामुळे शक्ती प्रदर्शन करून काय करणार असा सवाल उपस्थित करत मतदान आपल्यालाच पडणार आणि विजय आपलाच होईल असा ठाम विश्वास आ.कैलास गोरंटयाल यांनी आज येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
जालना विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने आ.कैलास गोरंटयाल आणि माजी नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल यांनी आज गुरुवारी दुपारी जालन्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हरकर आणि तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती छाया पवार यांच्याकडे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी महेश सारस्वत, विजय चौधरी, दीपक भुरेवाल, महावीर ढक्का, सागर चिलका, विनोद यादव, राजेश पवार आदींची उपस्थिती होती. उमेदवारी दाखल केल्यानंतर उपस्थीत पत्रकारांशी बोलतांना आ. कैलास गोरंटयाल म्हणाले की, आज आपण नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. पक्षाकडून एबी फॉर्म लवकरच मिळणार असून तो प्राप्त झाल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणखी नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहे. तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी विजयाचा दावा केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले भास्कर दानवे यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. जितके जास्त उमेदवारी अर्ज दाखल होईल तितकी मोठी लीड मला राहील असे स्पष्ट करून विजयाची खात्री तर आपल्याला पहिल्या पासूनच आहे. कारण ज्या दिवशी मी आमदार झालो. फक्त काम केले, आणि ठोक काम केल्याचे जनतेला दाखवून दिले. पाण्याचे काम ठोक झाले, मेडिकल कॉलेजचे काम ठोक झाले, रस्ते, नाल्या आणि इतर विकासाची अशी किती तरी काम केलेली आहेत.






