आशाताई बच्छाव
….तर याच शैक्षणिक वर्षापासून मेडिकल कॉलेज सुरू होईल – आ.कैलास गोरंटयाल जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांची पदे तातडीने भरावीत यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे. शासनाने सदर पदे भरल्यास याच शैक्षणिक वर्षापासून सदर कॉलेज सुरू होईल असा विश्वास आ. कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला आहे.
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी पासून त्यासाठी जागा निश्चिती आणि अन्य सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आ. कैलास गोरंटयाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून विधिमंडळाच्या पावसाळी, हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या प्रश्नावरून सभागृहात टोकाचा संघर्ष करत जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या या संघर्षाची दखल घेत जालन्यातील मंजूर करण्यात आलेल्या या महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासह वसतिगृह आणि अन्य बाबींसाठी तब्बल ४०४ कोटी रुपयांचा निधी देखील मागील काही महिन्यांपूर्वी मंजूर करून त्याची तरतूद केली आहे. मात्र, पद भरतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जालन्यासह राज्यातील ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पदभरती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाकडून दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. दि. २४ जून २०२४ रोजी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जालना येथे आले होते. या पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेली जागा व अन्य बाबींची तपासणी करून त्यात काही त्रुटी काढल्या होत्या. मात्र सदर त्रुटींची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल मेडिकल कौन्सिलकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगून आ.गोरंटयाल म्हणाले .