आशाताई बच्छाव
मायभूमित स्वच्छता अभियानातून सीआरपीएफ जवानाची देशसेवा
अयुबखान पठाण यांनी दिला स्वच्छतेतून निरोगी आरोग्याचा मंत्र
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- ‘जैसे आपण स्नान करावे | तैसे गावही स्वच्छ ठेवीत जावे | सर्वचि लोकांनी झिजूनी घ्यावे | श्रेय गावाच्या उन्नतीचे |’ हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ओवीचा अर्थ सीआरपीएफ जवान आयुबखान पठाण यांनी आपल्या स्वच्छतेच्या कार्यातून लोकांसमोर ठेवला आहे. आपल्या मायभूमितून स्वच्छतेचा श्रीगणेशा करणारे अयुबखान पठाण यांनी स्वच्छता अभियानातून देशसेवा करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार देशाच्या विविध भागात त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला आहे. नुकतेच त्यांनी जैनांची काशी असलेल्या शिरपूर जैन येथे स्वच्छता अभियाना राबवून लोकांना निरोगी आयुष्याचा मुलमंत्र दिला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
अयुबखान पठाण हे मुळचे रिसोड तालुक्यातील हिवरा रोहीला येथील रहिवासी असून सध्या गुजरात मधील गांधीनगर येथे सीआरपीएफ या पदावर कार्यरत आहेत. लहानपणापासून अयुबखान पठाण यांना स्वच्छतेची आवड होती. ही सवय त्यांनी शासकीय सेवेत असतांना सोडली नाही तर त्याला कृतीची जोड दिली. कर्तव्यावर असतांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते देशाच्या विविध भागात जावून स्वच्छता अभियान राबवितात. व या अभियानात लोकांना सामील करुन घेतात. नुकतेच त्यांनी शिरपूर येथे पोलीस स्टेशन समोर स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात त्यांच्यासोबत ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनीही साथ देवून प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता अभियान राबविले. पठाण यांनी देशसेवा करत असतांना जम्मु काश्मीर, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, झारखंड आदी देशाच्या विविध भागात सेवा दिली आहे. स्वच्छता अभियानात राबवित असतांना ते परिसर स्वच्छता, नाल्यांचा उपसा करत असतांना वृक्षारोपणावरही भर देतात. आजपर्यत त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करुन परिसर हिरवागार केला आहे. स्वच्छता व वृक्षारोपणाच्या माध्यमातून देशात स्वच्छतेचा जागर करण्यासह सर्व समाजात बंधुभाव, सामाजीक एकात्मता कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशसेवेसह समाजातील कार्य करणार्या अयुबखान पठाण यांच्या त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सामाजीक कार्याचे विविध स्तरातून कौतूक होत आहे.