आशाताई बच्छाव
ईश्वराच्या नामस्मरणात सुखद लहर निर्माण करण्याची ताकद असते. माहोरा जालना प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक 10/07/2024
२ अक्षर का प्यारा नाम “जय श्री राम जय श्री राम” असं ऐकलं तरी नकळत आपली मान डोलायला लागते. मनात एक सुक्ष्म अशी सुखद लहर निर्माण होते. कां बर असं होतं असावं?
नामात सुक्ष्म शक्ती असते,ती दिसत नाही पण ती परीणाम मात्र नक्की घडवते. नामातून निर्माण होणारी स्पंदनं मन निर्विचार करतात.मन नामाशी एकरूप होऊन तल्लीन होते. असं मन त्या देवतेच्या रूपाशी एकाकार होते, हीच एक अनुभूती असते.. आनंददायी, स्व ला वीसरवणारी !
देहभान हरपून टाकणारी. फक्त ध्येय आणि ध्याता !
मनावर आलेली देहबुद्धीची जळमटं बाजूला होतात. अथांग वाहणार्या मनाला थांग लागतो. जसे कडकडीत भूक लागल्यावर समोर येणारं अन्न, तहानेने व्याकूळ झालेल्या अवस्थेत अचानक थंडगार पाणी मिळाल्यावर जसा तो जीव इकडे तिकडे न बघता आपली क्षुधा,
तॄषा शांत करण्यात पूर्ण पणे रमतो.
तसंच नामात एकरूपता झाल्यावर मन आपल्या आराध्याशी एकरूप होऊन जाते व अनुभूती मिळवते.
अखंड नामस्मरण करावे, निदान दिवस भरात काही काळ तरी भगवत्स्मरणात असावे असे सर्व संत,सत्पुरूष, वैदीक ग्रंथ, व आपला सनातन धर्म सांगत आलेत व आहेत. कारण ती अनुभूती त्यांनी घेतलेली असते!
वाल्या कोळी नामाने तरला, थोर वाल्मिकी ॠषी झाले.
सतत हरीच्या नामस्मरणात
असणाऱ्या प्रल्हादाला दुष्ट पापी पीत्यापासून रक्षण व त्या राक्षसाचा वध केवळ हरिभक्तीच करू शकली. ध्रुव बाळाला अढळपद हरिस्मरणामुळेच प्राप्त झाले. शबरीची उष्टी बोरे खाणारे व तीला प्रत्यक्ष भेट देणारे श्री राम केवळ तीच्या अलोट भक्तीचा परिपाक होता. अनेक संत केवळ हरिस्मरणामुळेच परमगतीला प्राप्त झाले. अचाट सामर्थ्य असलेले रामभक्त श्री हनुमंत समुद्र लांघुन गेले. अशी अनेक उदाहरणे ठाईं ठाई आढळतात. सारी पुराणे, उपनिषदे, चारही वेद
हरिभक्तीची थोरवी गातात. ” भक्तीचेन योगे देव | निश्चये पावती मानव | असा ठाम निर्णय समर्थ रामदास स्वामी देतात! अधोगती टाळायची असेल तर हरिस्मरण एकमेव साधन आहे!
इहलोकातुन परलोकी घेऊन जाणारी ही *नाव* आहे, तिच्यातच बसुन जीवनप्रवास केला पाहिजे. नामस्मरण करायला ना धन लागंत, ना वयाची अट, ना जातपात !!
” हरिनामावीण काळ घालवू नको रे ” असे संत महात्मे आवर्जून सांगतात.
सतत नामस्मरण घडता घडता अशी वेळ येते की , रोमारोमात नाम इतके भिनते की, मन, बुध्दी ,चित्तात हरि स्मरण होऊ लागते. जळी,स्थळी,काष्ठी,
पाषाणी फक्त श्री हरीच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. तो आणि मी वेगळा नाहीच, मी म्हणजे तो, व तो म्हणजे मीच ही जाणीव दॄढ होऊन,’असं ब्रम्हास्मि’ ची अनुभूती येऊलागते.
भय, चिंता,देहदु:ख, षट्विकारांचा प्रभाव कमी कमी होत जातो.
जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याच्याच अस्तित्वाची जाणीव होत रहाते! जीवन सफल संपूर्ण होते!!
*************************
शब्दांकन…कॄष्णसखी