आशाताई बच्छाव
भेल कंपनी पिडीत आदिवासी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न : प्रकृती चिंताजनक
शासनाने नाकारली होती उपोषणाची परवानगी ; साकोली तालुक्यासह जिल्ह्यात “भेल” चे वातावरण तापले
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)साकोली तालुक्यातील हजारो व जिल्ह्यातील लाखों युवा बेरोजगारांचे स्वप्न असलेली “भेल पिप” १२ वर्षांपासून मुर्दाड अवस्थेत आहे. याबाबद येथील भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना वारंवार प्रशासनाला उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याची परवानगी मागत आहेत. पण शासन याकडे पार दूर्लक्ष करीत आहे. यातच मुलांच्या बेरोजगारीला कंटाळून एका आदिवासी शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या संतापजनक प्रकाराने साकोली तालुक्यासह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. सदर शेतकऱ्यावर भंडारा रूग्णालयात उपचार सुरू झाले आहे.
साकोली जवळील मुंडीपार सडक येथे १२ वर्षांपासून भेल पीप कंपनी बंद व मुर्दाड अवस्थेत असून वारंवार मुंडीपार सडक, बाम्हणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना विविध आंदोलने व उपोषणे करून थकलीत. नुकतेच प्रशासनाने भेल प्रकल्पग्रस्त समितीच्या उपोषणाची परवानगी नाकारली. या ५ जुलैला येथे उपोषणाला बसण्याचा निर्णय यांनी घेतला होता. मात्र २९ जुनला सायं. ७ वा. दरम्यान मुलांची वय वाढत चालली पाहून व यांच्या बेरोजगारीला कंटाळून बाम्हणी येथील भेल प्रकल्प ग्रस्त शेतकरी शंकर कंगाले वय ५४ वर्ष यांनी घरी काहीही न सांगता “५०५ शत्रूजीत” हे किटकनाशक विष प्राशान केले. घरी महिली कळताच भेल प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष विजय नवखरे व सहका-यांनी साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथील खा. प्रशांत पडोळे यांच्या रूग्णालयात आणले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी शंकर कंगाले यांची शेतीची जमीन भेल प्रकल्पात गेली व हा प्रकल्प १२ वर्षा पासुन बंद असल्याने नैराश्य मध्ये गेले. त्यांना दोन मूल आहेत एक मुलगा बेरोजगार असून वडील व मुलगा मोल मजुरी करून प्रपंच चालवितात. मुलाचे वाढते वय व परीस्थीती दिवसेंदिवस वाईट होत असल्याने त्यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा पवित्रा घेतला. आताही शंकर कंगाले यांची प्रकृती चिंताजनक आहे परंतु लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे भेल प्रकल्पग्रस्त आणी युवा बेरोजगार यांची मानसीकता दिवसेंदिवस खचत आहे. आतातरी शासनाने याची गंभीरतेने दखल घेऊन एकतर भेल कंपनीबाबद ठोस पाऊल उचलावे अथवा शेतकऱ्यांना त्या जागेवर शेती तरी करू द्यावे असा पवित्रा घेतला आहे. अन्यथा हे आंदोलन साकोलीसह भंडारा जिल्ह्यात उग्र रूप धारण करेल असाही इशारा देण्यात आला आहे.
“भेल प्रकल्पात आमची चांगल्या उत्पन्नाची जमिन गेली. हा प्रकल्प सुरू न झाल्याने आम्ही बेरोजगार झालो. सांगितले होते की तुमचा एक मुलाला येथे भेल कंपनीत ड्यूटीवर लाऊन देऊ. याचाच मानसिक ताण माझ्या वडीलांनी घेतला व विष प्राशन केले, अखेर कुठपर्यंत आम्हाला शासन ताटकळत ठेवणार आहेत”
— मुकेश कंगाले रा. बाम्हणी – विष घेतलेल्या शेतकऱ्याचा मुलगा
“ही फार दूर्देवी घटना आहे. या भेल कंपनीबाबद शासन कित्येक वर्षांपासून भुलथापा देत आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. यात पिडीत शासनापुढे आपली प्रतिक्रियाही मांडू शकत नाही काय.? शासनाने या भेलच्या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे”
— डॉ. सोमदत्त करंजेकर
“सामाजिक कार्यकर्ता”
साकोली तालुका
“आमच्या युवा बेरोजगारांना नोकरीच्या संदर्भात व शेतकऱ्यांच्या हितासाठी या आंदोलनाची दखल कुणीच घेत नाही. आता मात्र या आदिवासी शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आता तरी शासन जागृत होईल काय अन्यथा आम्हाला जिल्हाभर आंदोलन करावे लागणार. दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी बघता युवा व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्यूला आमंत्रण देत आहेत. आता मात्र फार झाली. शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जाईल”
— विजय नवखरे अध्यक्ष भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना मुंडीपार सडक