आशाताई बच्छाव
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा बसविण्यात यावा —
जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
गेल्या दोन दिवसांपूर्वी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, नानासाहेब पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्र्यंबकेश्वर मंदिराचे निर्माण करणारे नानासाहेब पेशवे व ज्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतून हे मंदिर उभे राहिले असे छत्रपती शिवाजी महाराजांना यांचा निमित्ताने सन्मान करण्यात आला असला तरी १७८९ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या योगदानाचा मात्र विसर पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, नानासाहेब पेशवे यांच्यासोबत अहिल्यादेवी होळकर यांचा देखील पुतळा मंदिर परिसरात बसवण्यात यावा अशी मागणी धनगर समाजबांधवांनी केली आहे.
या बाबतचे निवेदन धनगर समाजबांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी सो यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नानासाहेब पेशव्यांनी मंदिर बांधले तर त्याच मंदिराचा जिर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. अहिल्यादेवी यांनी त्र्यंबकेश्वरच नाही तर देशभरात पडझड झालेल्या देवस्थाने, मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदू धर्म व संस्कृती जतन करण्याचे काम केले. काशी विश्वेश्वर, सोरटीचे सोमनाथ मंदिर असो अहिल्यादेवी यांनी मंदिर निर्माणासाठी कधी मागे बघितले नाही. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त घाटाची निर्मिती अहिल्यादेवी होळकर यांचीच आहे. मंदिराच्या परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सन्मानाने बसवण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी बहुउद्देशीय संस्था नायगाव (सिन्नर) चे अध्यक्ष उत्तम पाबळे, अशोक चिखले, गोरख जाधव, कैलास आडभाई, संदीप ओहळ, शाताराम भादेकर, कचरू तागड, दौलत तागड, संतोष पल्हाळ यांचेसह धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
@भविष्यात राज्यातील धनगर समाज बांधवांनी या विषयावर आंदोलने केली, तर नवल वाटू नये. आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील त्र्यंबकेश्वर येथील या प्रकाराबद्दल भेटून माहिती देण्यात येईल.
भाऊसाहेब ओहळ, नाशिक जिल्हा अध्यक्ष धनगर समाज