आशाताई बच्छाव
करंजगावच्या गोदापात्राने घेतला मोकळा श्वास
खंडू बोडके-पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश–
दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे
निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव व परीसरात गोदापात्रात पाणवेलींचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य दूषित पाण्यामुळे धोक्यात आले होते. याबाबत करंजगावचे माजी सरपंच व राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी पाटबंधारे विभागाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या संपूर्ण पानवेली हटविल्या गेल्या आहेत. सुमारे दीड ते दोन किमी पसरलेल्या पाणवेली काढल्यामुळे गोदावरीच्या गोदापात्राने मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे करंजगावकर नागरीकांना शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाल्याने त्यांनी पाटबंधारे विभाग प्रशासनासह खंडू बोडके-पाटील यांचे आभार मानले आहे.
दरवर्षी गोदावरी नदीच्या गोदापात्रात पाणवेलींमुळे पाणी प्रदूषित होऊन साथीचे रोग वाढतात. वारंवार पाठपुरावा करूनही यावर्षी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने खंडू बोडके-पाटील यांनी मागील महिन्यात चांदोरी येथे वाळू डेपो उद्घाटनप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच घेराव घालत जाब विचारला होता. त्यामुळे तातडीने पाणवेली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. करंजगाव व दारणासांगवी नदीपात्रातील पाणवेली काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. माञ सायखेडा येथील पाणवेली अतिशय संथ गतीने काढण्यात येत असल्याने खंडू बोडके पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, यांत्रिकी विभाग कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून नाराजी व्यक्त केली आहे. पावसाआधी सायखेडा पुलाला अडकलेल्या संपूर्ण पाणवेली काढण्याचे आश्वासन जितेंद्र पाटील यांनी खंडू बोडके पाटील यांना दिले आहे. सदर पानवेली गतीने काढण्यासाठी उपअभियंता दीपक पाटील व राजेश गढे यांच्यावर जबाबदारी सोपवल्याची माहिती जितेंद्र पाटील यांनी खंडू बोडके पाटील यांना दिली.
◾गोदाकाठच्या नदीपात्रात दरवर्षी पाणवेली साचल्याने पाणी प्रदूषित होते. नाशिक शहरातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणवेली वाढत असल्याने त्यावर उल्हास नदीच्या धर्तीवर कायमस्वरुपी तोडगा प्रशासनाने काढावा. वारंवार पाठपुरावा करून करंजगाव नदीपात्र पाणवेलीमुक्त झाले आहे. सायखेडा येथील पुलाला अडकलेल्या पाणवेली अतिशय संथ गतीने काढण्यात येत असून त्यालाही प्रशासनाने तातडीने गती द्यावी.
खंडू बोडके-पाटील
मा.सरपंच करंजगाव ता निफाड
सदस्य : राज्य बियाणे उपसमिती मंत्रालय, मुंबई