आशाताई बच्छाव
नाशिक,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क) : सद्यस्थितीत पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस असून अद्यापमान्सूनला सुरुवात झालेली नाही. सप्टेंबर अखेर पाऊस वाढेल. महापूरांचा धोका कायम असून चार महिने मान्सून पुढे सरकला आहे असे प्राथमिक धक्कादायक निष्कर्ष मिळाले आहेत. मात्र 4 ऑक्टोबर नंतर निंबोस्ट्रेटस ढगांची निर्मिती प्रक्रीया वाढीस लागेल तसेच उत्तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरु होईल अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.
खरंतर मान्सून 01 जूनला सुरू होऊन 30 सप्टेंबरला संपतो. अशावेळी जवळपास चार महिने मान्सून पुढे सरकला आहे. आगामी दसरा-दिवाळीचे सण पावसाच्या पाण्यातच साजरे करावे लागतील, तसेच जानेवारी अखेर पर्यंत पाऊस बरसेल आणि फेब्रुवारीत देखील पाऊस दिसू शकेल. यंदा तब्बल जुलैत झालेला पाऊस सुर्यांवरील चुंबकीय वादळांमुळे झाला. विशेष म्हणजे यावर्षी अद्याप एकही प्रबळ चक्रीवादळ तयार झालेेले नाही ही देखील गंभीर बाब आहे. मान्सूनच्या बदललेल्या पॅटर्नच्या ‘न्यू नॉर्मल’ला शेतकर्यांनी व जनसामान्यांनी येत्या काळात घाबरून न जाता मान्सूनच्या नव्या पॅटर्नला स्वीकारावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरलेली आहेत. भरलेल्या धरणांनी पुढच्या वर्षाचा पाणी प्रश्न सुटल्याचा आनंद व्यक्त होत असला तरी तब्बल डिसेंबर पर्यंत पडणारा मोठा पाऊस धरणे आणि बंधाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा देणारा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आत्ताच धरणांचे आणि बंधाऱ्यांच्या पाण्याचे नियोजन करतांना त्यांची तपासणी व धरणांचे पाणी कमी करत आकाशातील व कचमेंट एरीयातील पाणी सामावण्यासाठी 30 ते 40 टक्के जागा निर्माण करणे गांभीर्याने व तातडीने आवश्यक गरजेचे आहे. आत्तापासूनच धरणांतील पाणी टप्याटप्याने सोडण्याची गरज आहे. तसेच त्यासाठी शेतीचे नियोजन आणि शेतकऱ्यांचे प्रबोधन-जागृती करणे गरजेचे असल्याचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहे.
सूर्यावरील निर्माण झालेली वादळी परिस्थिती
सूर्यावर निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीमुळे वैश्विक किरणे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आदळल्याने पृथ्वीच्या वातावरणात खळबळ झाली, परिणामी क्युम्योलोनिंबस ढगांची निर्मिती होत असल्याने ढगफुटी होत आहे. वातावरणात तयार झालेल्या भोवऱ्यांमुळे जुलै महिन्यात ‘रेकॉर्ड ब्रेक’ पाऊस झाला. नोव्हेंबर नंतर देखील महाराष्ट्रासह भारताच्या बहुतांश भागात मोठा पाऊस पडणार असल्याने सर्व धरणांच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचेही प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहे.
नाशिकलाही धोक्याचा इशारा
नाशिक जिल्ह्यात जवळजवळ सर्वच धरणे जवळपास 100 टक्क्यांहून अधिक क्षमतेने भरलेली आहेत. मान्सून परततांना जानेवारी 2023 मध्ये देखील ढगफुटींसह मोठा पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे, त्यामुळे गोदावरी सह सर्वच नद्यांना आणि सायखेड्यासारख्या गावांना महापुराचा धोका होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर मध्येही पावसाचे प्रमाण राहणार आहे. ऑक्टोबरनंतर पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होऊन पावसाळा जानेवारी पर्यंत लांबणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस दिर्घकाळ आव्हाने देत ठाण मांडणार आहे. तेव्हा घाबरून न जाता बदललेल्या मान्सून पॅटर्नच्या ‘न्यू नॉर्मल’चा स्वीकार करावा अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे.