आशाताई बच्छाव
भिंबरपाडा येथील सौर ऊर्जेवरील नळ योजना बंद : ग्रामपंचायत, पाणी पुरवठा विभाग बघण्याच्या भुमिकेत
विक्रमगड,(वैभव पाटील): तालुक्यातील मोह बु. ग्रामपंचायत अंतर्गत भिंबरपाडा येथील सौर ऊर्जेवरील नळ पाणीपुरवठा योजना ५ महिन्यापासून बंद असून ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा विभाग फक्त बघण्याच्या भुमिकेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पाणी पुरवठ्याच्या योजना राबविल्या जातात. मात्र त्या नादुरुस्त झाल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
भिंबरपाडा येथील लोक वस्तीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एका बोअरवेलमध्ये मोटार बसवून सौर ऊर्जेवरील नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे, मात्र या योजनेद्वारे फक्त काही थोडे दिवस पाणी जनतेला मिळाले, मे महिन्यात ही नळ योजनेतील मोटार बंद झाली, आज जवळपास ५ महिने झाले आहेत, यासंदर्भात वारंवार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कळवूनही या योजनेकडे ग्रामपंचायतीचे लक्ष जात नाही. ग्रामपंचायती व पाणीपुरवठा विभागाने ही सौर ऊर्जेवरील नळ पाणीपुरवठा योजना लवकरच दुरूस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.