आशाताई बच्छाव
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’चा श्री क्षेत्र परशुरामभूमीतून शुभारंभ !
चिपळूण/रत्नागिरी,(सुनील धावडे) – हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने गेली २० वर्षे कार्यरत आहे. या वर्षी २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात नवरात्रातील घटस्थापनेच्या प्रथम दिवशी, समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ ३१ ऑगस्ट ते ८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ २९ ऑगस्ट २०२२ या दिवशी परशुरामभूमीतून अर्थात चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र परशुराम येथून भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या प्रसंगी चिपळूणचे ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव, ज्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेची प्रथम बैठक झाली ते श्री विरेश्वर मंदिर आणि श्री क्षेत्र परशुराम येथील श्री परशुराम मंदिर या ठिकाणी देवतांच्या चरणी श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून हे अभियान यशस्वी होण्यासाठी देवतांना प्रार्थना आणि आशीर्वाद घेण्यात आले.
या प्रसंगी श्री परशुराम मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेच्या प्रक्रियेत कृतीशील असणार्या सर्वश्री विश्वास चितळे, अमोल जोगळेकर, ह.भ.प. प्रकाश महाराज जाधव आदी हिंदुत्वनिष्ठांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानचे विश्वस्त आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ह.भ.प. अभयमहाराज सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘‘हिंदूंच्या देवतांचे विडंबन रोखण्यासाठी हिंदूंना प्रतिकारक्षम बनवण्याचे श्रेय हिंदु जनजागृती समितीला जाते.’’ चिरणी (ता. खेड) येथील मराठा ऐक्य परिवर्तन संस्थेचे सचिव आणि वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार ह.भ.प. अविनाश महाराज आंब्रे म्हणाले ‘‘हिंदु राष्ट्राच्या मागणीचा हक्क बजावण्यासाठी सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येणे आवश्यक आहे.’’ तर ‘‘अल्पावधीत देशभरात समितीचे कार्य पोचवण्यासाठी सहभाग घेतलेल्या प्रत्येकाप्रती आम्ही कृतज्ञ आहोत’’, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.
‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियानां’तर्गत हिंदूसंघटन मेळावे, वर्धापनदिन सोहळे, हिंदु राष्ट्र जागृती व्याख्याने, चर्चासत्र आणि परिसंवाद, पत्रकार परिषदा, हिंदु राष्ट्र शपथ ग्रहण कार्यक्रम, मंदिर आणि ऐतिहासिक यांची स्थळ स्वच्छता आदी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमांना श्री देव जुना कालभैरव देवस्थानचे विश्वस्त श्री. पंकज कोळवणकर, विश्व हिंदु परिषदेचे उत्तर रत्नागिरी जिल्हामंत्री श्री. उदय चितळे, उद्योजक श्री. शैलेश टाकळे, राजस्थानी समाजाचे सर्वश्री हिरालाल चौधरी, ह.भ.प. नारायण महाराज पवार, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत पालांडे, भाजपचे खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, पेठमाप येथील श्री महाकाली देवस्थानचे सल्लागार श्री. मोहन तांबट, भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटन सरचिटणीस नागेश धाडवे आदी उपस्थित होते.