आशाताई बच्छाव
उक्षी रेल्वे स्थानकावर दिवा-सावंतवाडी, तुतारी एक्स्प्रेस थांब्यासाठी ना.उदय सामंत यांची भेट रत्नागिरी,(सुनील धावडे)
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी रेल्वे स्थानकावर दिवा-सावंतवाडी, तुतारी एक्स्प्रेस थांबण्यासाठी ग्रामस्थांनी ना.उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली आणि या स्थानकावर गाड्या थांबण्यासाठी निवेदन अर्जही दिला आहे.
रत्नागिरी संगमेश्वर या दोन्ही तालुक्याच्या मध्यभागी असलेले कोकण रेल्वेचे उक्षी स्टेशन हे अती दुर्गम भागात आहे. येथील जाकादेवी पंचक्रोशी व खाडी पट्ट्यातील जवळ जवळ पंचवीस ते तीस गावातील प्रवासी या स्टेशनवरून प्रवास करत असतात.
रत्नागिरी व संगमेश्वर या दोन्ही तालुक्याची जाकादेवी, चवे, ओरी, तरवळ, आगवे, विल्ये, बोंड्ये, नार्शिंगे, राई, रानपाट, पोचरी, मेढे, मांजरे, उपळे,बडावखोल, कोंड्ये, फुणगुस, उक्षी,वांद्री, देन, परचुरी, आंबेड बुद्रुक, कोळंबे, मानस्कोंड, डींगणी अशा अनेक गावातील प्रवाशांच्या फायद्याचे हे स्टेशन आहे. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून या ठिकाणी दोन्ही वेळेत जाणाऱ्या व येणाऱ्या पेसेंजर गाड्या थांबा घेत होत्या. कोरोना महामारीचे देशावर संकट आल्यावर बंद असलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर येणारी दिवा सावंतवाडी व मुंबई कडे जाणारी या गाडीचा थांबा रद्द करण्यात आला.
या गाड्या पुन्हा थांबण्यासाठी रिक्षा चालक व मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन समस्येची कल्पना दिली. याची दखल घेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्वरित केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्रही दिले आहे.
या वेळी उक्षी गावचे माजी सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, पांडुरंग पाताडे, ओमकार घडशी, सुशांत मेस्त्री, सुरेंद्र देसाई, संदीप सापटे, संभाजी दुदम इत्यादी रिक्षा चालक व ग्रामस्थ उपस्थित होते.