आशाताई बच्छाव
तळवली ग्रामपंचायतचा अनिष्ट विधवा प्रथा बंदचा ग्रामसभेत एकमुखी ठराव रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला.
तळवली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच यशोदा सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत सर्वानुमते विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या ठराव मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेसाठी ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
आज विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो तरीही, पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही.
या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज आहे. यासाठी शासन निर्णयाची नुकतीच तळवली ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत सर्वानुमते विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेसाठी सरपंच मयुरी शिगवण, उपसरपंच अनंत डावल, सदस्य सुनील मते, संतोष जोशी, सचिन कळंबाटे, पूर्वा पवार, सविता शिंदे, मानसी पोफळे, पोलीस पाटील विनोद पवार, ग्रामविकास अधिकारी श्री बागुल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






