आशाताई बच्छाव
आंबा बागायतदारांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आठ दिवसात घेणार बैठक : उदय सामंत रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आंबा बागायतदार यांचे प्रश्न महत्वपूर्ण असून ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या आठ दिवसात मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली.
सामंत म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात आंबा बागायतदार यांच्यासाठी मंत्रालयात सकारात्मक बैठक कदाचित होऊ शकली नसेल. आंबा बागायतदार यांचे प्रश्न महत्वपूर्ण असून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. कोकणातील आंबा बागायतदार यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेऊ असे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले युती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत – जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडविणे हा युती सरकारचा प्राधान्यक्रम आहे, असे यावेळी श्री.सामंत म्हणाले.
श्री.सामंत म्हणाले, पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत आंबा बागायतदार यांचे प्रश्न सकारात्मकपणे सोडवले जातील, असा मला विश्वास आहे. युती सरकार हे समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेलं आपलं सरकार आहे.