आशाताई बच्छाव
संपादकीय….
बा विठ्ठला सदबुध्दी दे..!
वाचकहो,
आज देवशयनी एकादशी.म्हणजे अर्थातच आषाढी एकादशी.हिंदुत्वाची प्रखर ज्योत तेवत ठेवण्याचे महान कार्य वारकरी साप्रंदायाने अगदी मोठ्या नेटाने सुरुच ठेवले आहे.हीच ती मोठी अखंड महाराष्ट्राची अद्भूत शक्ती मानता येईल.अगदी कुणाच्याही बोलण्यावरुन नाही,तर प्रत्यक्ष आपल्या पांडूरंगाला देवा विठ्ठलाला भेटायला महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून अगदी तरुणांपासून तर आबालवृध्दापर्यत सारेच आज पंढरपूरात दाखल होतात.विठूरायाच्या नामस्मरणाचा गजर होता.आणि पुन्हा पुढील वर्षीच्या या सोहळ्याची आस मनात ठेऊन भाविक वारकरी माघारी फिरतात.मात्र महाराष्ट्राचे आजचे चित्र बघितले तर दुर्दैवाने लिहावे लागत आहे.कित्येकांचे आई बाप रस्त्यावर भीक मागता मागताच तडफडून मेलेत.तरीही अशा भामटया लोकांकडून आज सोशल मिडीयावर “आमचा विठ्ठल”म्हणून गाजावाजा केला गेला.खरं तर प्रत्यक्षात विठूरायाची बरोबरी कुणीच करु शकत नाही.कुठे तो पंढरीचा राणा विठूराया…आणि कुठे आम्ही..आमचे विचार संस्कार आचार जर चांगले नसतील तर काय अधिकार आहे आम्हांला “ज्या बापाला आम्ही जीवंतपणी सुख देऊ शकलो नाहीत त्याला विठूरायाच्या पंक्तीत बसविण्याचा?” तेवढी लायकी व औकात तरी आहे का आमची?आज याच प्रश्नासह महाराष्ट्रात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.ज्या आईबापांनी आमच्यासाठी आयुष्य झिजविले.खस्ता खात त्याग केला बलिदान देऊन आपले जीवन पोराबाळांसाठी समर्पित केले,त्याच आईवडीलांची काय अवस्था आहे?आयाबहिणीची अब्रु वेशीवर टांगली गेलीय.कायदा सुव्यवस्था विकली गेली.न्याय सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर चालला.महागाईचा आगडोंब उसळला.अविवाहित मुलांचे विवाह जमेनासे झालेत.गर्भातच मुलीची हत्या करण्याचे हे महापाप निष्पाप मुले भोगतायेत…कुणालाच कुणाचा आदर व मानपान राहिला नाही,धाक नावाची वस्तू तर बा विठ्ठला आता औषधालाही सापडत नाही.अशी अनेक प्रश्न या महाराष्ट्राला सतावत आहेत.विज्ञानयुगाच्या उंबरठयावर पाऊल ठेवणारी ही दुनिया मोबाईलने पुरती वेडी झालेली आहे.चांगल्या वाईट गोष्टीची कुणालाच चाड राहिलेली नाही,स्वार्थ व पैशांसाठी सगळेच सैरभैर झाले आहेत.देव,धर्म पेक्षाही पैसा सर्वश्रेष्ठ ठरला आहे.आणि हीच परिस्थिती राहिली तर भविष्यात माणसं नव्हे तर जीवंत भुते फिरतील.माणूसकी,मानवता,जिव्हाळा ,आपुलकी,सहानुभूती हे सगळेच विषय संपून जातील.! …..बा विठ्ठला आता तुच सदबुध्दी दे…हीच आजच्या आषाढी निमिताने तुझ्या चरणी प्रार्थना!!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक
युवा मराठा न्युज महाराष्ट्र