राजेंद्र पाटील राऊत
शासकीय धान खरेदीच्या निर्धारीत उद्दिष्ट्यांत वाढ करण्यात यावी
आमदार गजबेंची अन्न व नागरी पुरवठा मंञ्यांकडे मागणी
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असल्याने जिल्ह्यात उत्पन्नाचे एकमेव साधन असलेल्या शेतीच्या भरोशावर उपजीविका अवलंबून असल्याने येथील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान फसलीची लागवड केली. माञ शासन स्तरावरुन खरेदीचे अत्यल्प उदिष्ट्य देण्यात आल्याने नोंदणीकृत शेतकरी शासकीय धान खरेदी केन्द्रावर धान विक्री पासुन वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता शासकीय धान खरेदीच्या निर्धारीत उद्दिष्ट्यांत वाढ करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंञी ना. छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की पणन हंगाम २०२१-२२ मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत संदर्भिय शासन आदेशान्वये दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या अभिकर्ता संस्थेला गडचिरोली जिल्ह्यातील शेतक-यांकडुन रबी हंगामातील धान खरेदीसाठी ४० हजार २२६ क्विंटल तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक या अभिकर्ता संस्थेला गडचिरोली ८५ हजार,अहेरी ५० हजार ५०९ असे एकुण १ लाख ३५ हजार ५०९ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन अंतग॔त एकुण ४ हजार ८८० शेतक-यांनी व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतग॔त ८ हजार ४२२ शेतक-यांनी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.हेक्टरी २४ क्विंटलच्या मर्यादेत धान खरेदीची मर्यादा धरल्यास अनुक्रमे किमान २ ते ३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मिळणे आवश्यक आहे.परंतु जिल्ह्यात दोन्ही अभिकर्ता संस्थाना खरेदीची अत्यल्प उदिष्ट्य देण्यात आल्याने नोंदणी केलेल्या शेतक-यांपैकी मोठ्या प्रमाणात शेतकरी आधारभूत धान खरेदी योजनेपासुन वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यास्तव जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतक-यांकडुन गडचिरोली जिल्ह्याला निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांत वाढ करुन दोन्ही अभिकर्ता संस्थाना अनुक्रमे किमान २ व ३ लक्ष क्विंटल धान खरेदी करण्यास मंजुरी देण्यात यावी व तसे संबंधितांना तत्काळ निर्देश देण्याची मागणी आमदार गजबे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंञी ना.छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.निवेदनाची प्रत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आली आहे.या संदर्भात पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे येथील शेतक-यांचे लक्ष लागुन आहे.






