राजेंद्र पाटील राऊत
करोना महामारीच्या तीन लाटा, पर्यटन उद्योगाला उतरती कळा..?
मुंबई ( अंकुश पवार,मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल पेपर)
करोना महासाथीच्या तीन लाटांमुळे पर्यटन उद्योगाशी संबंधित सुमारे २ कोटी १५ लाख लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या असल्याची माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सोमवारी दिली.
‘महासाथीच्या पर्यटनावर झालेल्या परिणामाबाबत आम्ही अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, करोनाच्या पहिल्या लाटेत १ कोटी ४५ लाख, दुसऱ्या लाटेत ५२ लाख, तर तिसऱ्या लाटेत १८ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या,
देशात करोनाची महासाथ धडकण्यापूर्वी ३ कोटी ८० लाख लोक पर्यटन उद्योगाशी संलग्न होते. करोनाच्या तीन लाटांदरम्यान पर्यटन अर्थव्यवस्थेची घसरण झाली. या लाटांनी केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटन क्षेत्राला जोरदार तडाखा दिला.
२०२० सालच्या सुरुवातीला पहिल्यांदा आलेल्या करोना उद्रेकाच्या पहिल्या लाटेदरम्यान देशात पर्यटक येण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांनी, दुसऱ्या लाटेत ७९ टक्क्यांनी, तर तिसऱ्या लाटेदरम्यान ६४ टक्क्यांनी कमी झाले,
या क्षेत्राला मदत करण्यासाठी प्रवास व पर्यटनाशी (ट्रॅव्हल अँड टुरिझम) संबंधितांना १० लाख रुपयांचे आणि टूरिस्ट गाईडना १ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. शक्य असेल त्या सर्व मार्गानी पर्यटन क्षेत्राला मदत करण्याचे आवाहन मी सर्व राज्य सरकारांना करतो, असे मंत्री म्हणाले.




