राजेंद्र पाटील राऊत
महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची कलाबेन डेलकर यांच्या विजयाने पहिली विजय पताका ….
ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक,ठाणे /युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
दादरा-नगर हवेलीमधील डेलकर यांचा विजय बरंच काही सुचित करणारा असल्याचं म्हणत आता दिल्लीचा दरवाजाही ठोठावणार असा हुंकार शिवसेनेनं भरला आहे.
मोदींच्या जीवावर शिवसेनेचे १८ खासदार निवडणून आल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना या निवडणुकीमधून उत्तर मिळाल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
“सात वेळा निवडून आलेला एक खासदार प्रशासनाच्या हुकूमशाहीस कंटाळून आत्महत्या करतो ही देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी लाजिरवाणीच घटना होती. डेलकर यांच्या आत्महत्येने फक्त दादरा-नगर हवेलीचीच जनता नव्हे, तर महाराष्ट्र-गुजरातला धक्का बसला. डेलकर कुटुंब त्या धक्क्यातून सावरेल काय? हा प्रश्न होताच, पण शेवटी शिवसेनेच्या आधारात डेलकर कुटुंब आणि तेथील जनता अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज झाली. त्याच लढ्याची पहिली ठिणगी म्हणून कलाबेन डेलकर यांच्या विजयाकडे पाहिले पाहिजे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची पहिली विजय पताका फडकली आहे व त्या विजय पताकांचे राष्ट्रीय तोरण झाल्याशिवाय राहणार नाही. कलाबेन डेलकर या ५१,२६९ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. हा विजय ऐतिहासिक आहे,” असं लेखात म्हटलं आहे.
“मुंबईतील ‘दादर’ ते ‘दादरा’ असा हा शिवसेनेचा प्रवास दिल्ली दरवाजापर्यंत नक्कीच धडक देईल. दादरा-नगरच्या विजयाने शिवसेनेची, हिंदुत्ववाद्यांची,अन्यायाविरुद्ध लढणाऱयांची दिवाळी अधिक तेजोमय झाली. शिवसेना महाराष्ट्राबाहेर काय दिवे लावणार? असे प्रश्न ज्यांना पडत होते त्यांनी शिवसेना विजयाचे हे तेजस्वी दीप पाहायलाच हवेत. दादरा-नगर हवेलीचा विकास व भयमुक्त प्रदेश या धोरणानेच शिवसेना तेथे काम करील. शिवसेना शब्दाला, वचनाला जागणारा पक्ष आहे याची प्रचीती डेलकर कुटुंबास आणि दादरा-हवेलीच्या जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. दादरा-नगर हवेलीचा विजय हा नुसता विजय नसून देशातील हुकूमशाही प्रवृत्तीस दे धक्का आहे. असे धक्के देशातील अनेक भागांत बसले आहेत,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.
गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता, पोस्टरवर त्यांचे चित्र न लावता शिवसेना जिंकली व देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपाला माती खावी लागली. दिवाळीचे फटाके फुटू लागले आहेत. कुणाला दिवाळीनंतर बॉम्ब फोडायचे असतील तर ते फोडावेत. त्या बॉम्बमध्ये दारू शिल्लक आहे काय तेवढेच एकदा बघा. नाही तर हसे व्हायचे. दिवाळीचा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा असा विजय महाराष्ट्राने मिळवला आहे. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देश पातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र व जनतेची भरभराट होईल, हीच शुभेच्छा!,” असं लेखात म्हटलंय