Home मुंबई कुणी घर देता का घर! ; टाळेबंदीनंतर बेघरांच्या संख्येत वाढ.

कुणी घर देता का घर! ; टाळेबंदीनंतर बेघरांच्या संख्येत वाढ.

265

राजेंद्र पाटील राऊत

कुणी घर देता का घर! ; टाळेबंदीनंतर बेघरांच्या संख्येत वाढ.

ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतही शेल्टर मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली असून या समितीने नुकतीच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन बेघरांसाठी धोरण तयार करण्याची मागणी केली. त्यानुसार शहरी बेघरांसाठी धोरण बनविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यासाठी बेघरांचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे. बेघरांना निवारा केंद्रांमध्ये तात्पुरता निवारा देणे, त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवून पुन्हा समाजामध्ये सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी करावयाचे प्रयत्न या बेघरांबाबतच्या धोरणामध्ये समाविष्ट असतील. त्यादृष्टीने शहरी बेघर व्यिक्तच्या मदतीसाठी १८००२२७५०१ हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांकही कार्यरत झाला आहे, अशी माहिती नियोजन विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दीघावकर यांनी दिली.

डोक्यावर हक्काचे छप्पर नसल्याने अनेक जण पदपथांवर किंवा मिळेल त्या जागी पथारी पसरतात. अशा बेघरांची संख्या मुंबईमध्ये सतत वाढत असून टाळेबंदीनंतर ही संख्या अधिकच वाढली आहे. या यंत्रणेला सामावून घेण्यासाठी पालिकेची निवारा केंद्रे आहेत खरी, पण ती यंत्रणादेखील तोकडी पडत आहे.
सर्वोच्च न्यायायलयाच्या आदेशानुसार एक लाख लोकसंख्येमागे एक बेघर निवारा केंद्र असावे. मुंबईची लोकसंख्या पाहता १२५ निवाऱ्यांची गरज आहे, असे मत बेघरांसाठी काम करणाऱ्या ‘पहचान’ या संस्थेचे ब्रिजेश आर्या यांनी व्यक्त केले. २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत ५७ हजार ४१६ बेघर आहेत. मात्र गेल्या दहा वर्षांत ही संख्या दोन लाखांच्या आसपास गेली असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
एकूणच जास्त लोकसंख्येचा भार वाहणाऱ्या मुंबईत बेघरांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. रेल्वे स्थानकांच्या फलाटावर, रेल्वे स्थानकांच्या बाहेरील पदपथावर, पुलाखाली बेघर वास्तव्यास असतात. मुंबईत लोहार चाळ, चर्नीरोड, मालाड, कुर्ला, दादर, माहीम अशा ठिकाणी बेघरांच्या वस्त्याच दिसतात. रस्त्यावरच सगळे विधी होत असल्यामुळे शहराचे विद्रूपीकरणही वाढते. टाळेबंदीच्या काळानंतर लोकांचा रस्त्यावरील वावर कमी झाल्यानंतर बेघरांचे अस्तित्व अधिकच जाणवू लागले, तर या काळात अनेकांचे रोजगार बुडाल्यामुळे बेघरांच्या संख्येत वाढच झाली. मात्र
बेघरांसाठी असलेल्या निवाऱ्यांची संख्या तितक्या गतीने वाढली नाही. आता मात्र पालिकेच्या नियोजन विभागाने या बेघरांचे सर्वेक्षण करण्याचे ठरवले असून त्यांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले आहे.

बेघर निवारा केंद्रांची पुरेशी संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. लवकरच चांदिवली, दहिसर, अंधेरी, गोवंडी येथे आणखी चार निवारा केंद्र कार्यान्वित होणार आहेत. तसेच माहुल येथे २२४ खोल्या बेघर निवाऱ्यासाठी उपलब्ध करून या ठिकाणी जवळपास १५०० व्यक्तींची व्यवस्था केली जाणार आहे. याच ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण केंद्रेही सुरू केले जाणार आहे. बेघरांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले