राजेंद्र पाटील राऊत
जिल्ह्यातील 1103 गावातील जलजीवन मिशन आराखड्यास मंजुरी, शाळा,अगंणवाडी नळ तात्काळ जोडणी करावी
कोल्हापूर : जिल्ह्यातील एकुण 1 हजार 103 गावातील 1 हजार 278 योजनांच्या 91 हजार 126 लाखाच्या जल जीवन मिशन आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. जल जीवन मिशन अंतर्गत शाळा व अंगणवाड्यांना नळ जोडणी कार्यवाही शीघ्र गतीने करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज जिल्हा पाणी व स्वच्छता समितीची बैठक झाली. या बैठकीत मान्यता दिलेला आराखडा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सादर करण्याचे ठरविण्यात आले.
प्रारंभी ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता मनिष पवार यांनी संगणकीय सादरीकरण करून जल जीवन मिशन अंतर्गत सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबास 55 लीटर प्रती दिन प्रती मानसी घरगुती नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
जल जीवन मिशन अंतर्गत शाळा व अंगणवाड्यांना नळ जोडणी देण्याची 100 दिवसांची मोहीम शासनाने घोषित केली आहे. त्याअंतर्गत शाळा, अंगणवाड्यांना नळ जोडणी देण्याची कार्यवाही शीघ्र गतीने करावी, असे जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जल जीवन मिशनच्या जिल्हा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ङिके. महाजन, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषीकेश गोसकी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे आदी उपस्थित होते.
युवा मराठा न्युज नेटवर्क .